FIR refusal controversy : अजितदादांसाठी रोहित पवारांचा एकट्याचा लढा, महाराष्ट्रातील नेते चौकशीवर गप्प का ?
पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांची वागणूक आपल्या नेत्यालाच मरणोत्तर धोका देणारी आहे. अजितदादांसाठी रोहित पवारांचा लढा आणि 'तपास' शब्दाच्या पुढे न जाणाऱ्या नेत्यांची भूमिका यावर विश्वंभऱ चौधरी यांचा लेख
X
Rohit Pawar evidence रोहित पवार यांनी ज्याला substantial म्हणता येईल एवढे पुरावे आता मांडले आहेत. खरं तर रोहितची जिम्मेदारी लाॅजिकल आरोप करूनही संपणार होती पण त्यांनी मोठं होमवर्क करून पुरावे सुद्धा मांडले. DGCA act डीजीसीएनं त्या विमान कंपनीला ऑपरेशन्स बंद करायला सांगितलेलं आहे. याचाच अर्थ दिलेले पुरावे मजबूत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारनं जे काम स्वतः होऊन करायला पाहिजे होतं जे रोहित पवारांनी केलं आहे. त्यासाठी पहिल्यांदा त्यांचं कौतुक.
'अपघाताची चौकशी करा' एवढी साधी अगदीच प्राथमिक मागणी देखील न करता तडफेनं पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे सत्तेतला खांदापालट करायच्या भूमिकेत वीजेच्या वेगानं शिरले. ज्यांनी खांदा द्यायचा ते खांदेपालटात गढून गेले. सत्तेतले वाटेकरी आणि रक्ताच्या नात्यात काय फरक असतो ते रोहितनं दाखवून दिलं. पहिल्या दिवसापासून हा तरूण मनुष्य एकटा किल्ला लढवत आहे. पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांची वागणूक नुसतीच आश्चर्यकारक नाही, आपल्या नेत्यालाच मरणोत्तर धोका देणारी आहे. या बाबतीत आश्चर्यावर आश्चर्य घडत आहेत. केंद्र सरकारचे हवाई वाहतूक मंत्री तेलुगु देसमचे आहेत. त्यांच्या कनेक्शनवर रोहित पवार बोललेले आहेत. याच खात्याचे राज्यमंत्री पुण्यात आहेत. त्यांनी किमान पाच सात वेळा पत्रकार परिषदा घेऊन तपासातली प्रगती सांगायला हवी होती. 'चौकशी होईल' एवढ्या स्टेटमेंटच्या पुढे ते जात नाहीत.
अजितदादा पुण्याचे पालकमंत्री होते. सत्ताधारी महायुतीच्या पुण्यातील एकाही नेत्यानं हा मुद्दा लावून धरलेला नाही. पुण्यात पाच आमदार, दोन खासदार, एक केंद्रीय राज्यमंत्री, एक राज्यातले कॅबिनेट मंत्री, एक राज्याच्या राज्यमंत्री आहेत पण सर्वत्र भयाण शांतता आहे. कोणी काही बोलायला तयार नाही, तपासावर काही सांगायला तयार नाही, तपासावर लक्ष ठेवायला तयार नाही. ज्येष्ठ पवारसाहेबांनी परिस्थिती बिकट होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पहिल्याच दिवशी दिलेली क्लिनचीट रोहित पवारांनी मेहनतीनं बरखास्त करून टाकली आहे. पवार साहेबांनी ममता बॅनर्जी यांनाच लक्ष्य करणं अनावश्यक होतं हेही नमूद केलं पाहिजे. या विषयात मोदी शहांनी बोलायला पाहिजे होतं. किमान चौकशी नीट होईल हे पहायला हवं होतं. तिकडेही शांतता आहे. फडणवीस अधूनमधून बोलतात पण कठोर चौकशी होईल यापेक्षा पुढचा गिअर पडत नाही. अत्यंत आश्चर्याचा भाग म्हणजे विमानाचा ब्लॅक बाॅक्स जो अतिशय उच्च तापमानाला म्हणजे 1100 डिग्री सेल्सिअसला अभेद्य राहण्यासाठी डिझाईन केलेला असतो, तो ही जळाला असं सांगितलं जातंय. तांत्रिकदृष्ट्या अशक्य वाटणारी गोष्टही या प्रसंगात घडली आहे.
रोहित पवारांनी एवढे पुरावे दिल्यानंतर भाजपच्या ट्रोलांपासून प्रवक्त्यांपर्यंत अनेक महाभाग रोहित पवारांवरच तोंडसुख घेत आहेत याला काय म्हणावं? ही कोणती मानसिकता आहे या लोकांची? तपास का करायचा नाही आहे गांभीर्यानं? एवढा मोठा नेता जातो आणि सत्ताधारी पक्षाचे लोक अत्यंत कॅज्युअल टिपण्ण्यांची स्वतःची दैनंदिन ओकारी थांबवू शकत नाहीत ही कोणती सभ्यता? ही काय पद्धत? आज तर कळस झाला. पोलीसांनी एफआयआर नोंदवून घ्यायलाच नकार दिला. म्हणजे हा अपघातच यावर पोलीस हे कोणतीही चौकशी करण्याआधीच ठाम आहेत. का? कोणत्या पुराव्यांच्या आधारे?
राज्यातल्या लोकांच्या मनातली शंका या सगळ्या क्रमानंतर दृढ होत आहे. म्हणून तपास गांभीर्यानं व्हायलाच हवा. विमान कंपनीला पाठीशी न घालता. कोणताही आप-पर भाव न ठेवता. श्रद्धांजली सभेत भाषणं करणं पुरेसं नाही, तपास नीट झाला पाहिजे.
(साभार - सदर पोस्ट विश्वंभर चौधरी यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






