Aditya Thackeray Leadership Style : आदित्य, 'शहरी' इमेज आणि गमावत असलेली 'संधी'
शिवसेना फुटीनंतर आदित्य ठाकरेंमध्ये जो जोश दिसला तो पुढे का दिसला नाही? महाराष्ट्राचा नेता' व्हायचं असेल तर हा 'उर्वरित महाराष्ट्र' समजून घेऊन पुढे जावं लागेल. शहरांच्यापलिकडे ग्रामीण भागातील लोकांशी कसं जुळवून घ्याल? आदित्य ठाकरे आणि राजकारण यासंदर्भात अक्षय शारदा शरद लेख...
X
Shiv Sena UBT Political Challenges २०२२ ला एकनाथ शिंदेंच्या बंडाने एकसंध शिवसेनेत फूट पडली. शिंदेंकडे अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद गेलं. शिंदेंनी थेट पक्षावर दावा ठोकला. सत्ता पदांचा ( साम, दाम, दंड, भेद या अर्थानेही.. ) त्यांना यात फायदा झाला. त्यांनी तो पद्धतशीर करून घेतला. 'महाशक्ती'च्या मदतीने त्यांनी मूळ शिवसेनेवर दावा ठोकल्याचं लोकांना मात्र रुचलेलं नव्हतं. दरम्यान आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांच्या सभांना लोकांचा भारी प्रतिसाद होता. 'गद्दारी' हायलाईट करत नेत्यांची भाषणं होत होती. उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली, पक्ष फोडला गेला त्याबद्दलची सहानुभूती लोकांत होती. त्याचं रिफ्लेक्शन या सभांत दिसत होतं. एकनाथ शिंदेंनी मात्र मुख्यमंत्रीपदावर येताच 'कॉमन मॅन' अशी एक इमेज उभी करायचा प्रयत्न केला. सत्तेकडे झुकत ठाकरे सेनेचा एक एक नेता शिंदेसेनेत जात होता. साम, दाम, दंड, भेद असं सगळंच या मुळाशी होतं. शिंदे नेता म्हणून आपल्यासाठी 'अव्हेलेबल' होतायत हे चित्रही दरम्यान तयार होऊ लागलेलं होतं. त्याचा पुरेपूर 'फायदा'ही या नेत्यांनी ( आणि अर्थात शिंदेंनी ) उचलला.
२०२४ची लोकसभा आली. जागावाटपातल्या कुरबुरी होऊनही एकसंध राहिल्याने महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांचा परफॉर्मन्स चांगला राहिला. महाशक्तीच्या आशीर्वादाने फोडले गेलेले पक्ष, 'चारशे पारची हवा', 'राष्ट्रीय' मुद्यांना मतदारांनी धुडकावणं आघाडीच्या फायद्याचं ठरलं. ठाकरेंच्या पक्षाला चांगलं यश मिळालं पण शिंदेंना मिळालेल्या जागा ( त्यांच्या दृष्टीने 'स्ट्राईक रेट' ) दुर्लक्षित करता येणाऱ्या नव्हत्या. लोकसभा निवडणुकीतलं यश गृहीत धरून पुढच्या विधानसभा निवडणुकीतले आडाखे बांधले गेले. दरम्यान निवडणुकीपर्यंत सगळं थंड बस्त्यात होतं. लोकसभेतली 'लाट' आपल्या बाजूने कायम राहील या भ्रमात नेते राहिले. दरम्यान आघाडीतल्या तीनही पक्षांतला बेबनाव विधानसभेच्या जागावाटपाच्या निमित्ताने पुढे आला. विधानसभेत शिंदेंनी ठाकरेंच्या तुलनेत लक्षणीय कामगिरी केली. ठाकरेंच्या २० पैकी सर्वाधिक जागा या मुंबईतून आल्या. अर्थात या निवडणुकीत महायुतीच्या विजयामागच्या अनेक फॅक्टरची ( EVM वगैरे ) चर्चा हा एक भाग होताच. पण पुढे मैदान बाकी होतं.
शिवसेना फुटीनंतर आदित्य ठाकरेंमधे जो जोश दिसला तो पुढे दिसला नाही. विधानसभा झाल्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अशी संधी होती. त्यावर पाणी टाकण्याचं काम झालं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या स्थानिक पातळीवर, स्थानिक नेतृत्वात लढवल्या जाव्यात असं म्हटलं. एका अर्थाने हे बरोबर आहे असं मान्य केलं तरी या कार्यकर्त्यांना नेतृत्वाकडून काही एक अपेक्षा असणारेत की नाही? एकीकडे स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांतही शिंदे झंझावाती सभा घेत असताना ( त्या चूक की बरोबर हा भाग वेगळा ) शिवसेनेचं ( UBT ) शीर्षस्थ नेतृत्व कुठंच दिसलं नाही. उद्धव ठाकरेंना तब्येतीच्या कारणास्तव काही मर्यादा असतील पण आदित्य ठाकरे यांचं काय? पक्षाची घडी विस्कळीत झालेली असताना कार्यकर्त्यांना ( निदान moral support ) बळ देण्याची आवश्यकता त्यांना का वाटत नसावी? मुळात सगळंच संपर्कप्रमुख वगैरे रचनेवर ढकलून नेतृत्व म्हणून कार्यकर्त्यांच्या मागे उभे आहोत हा संदेश देता येऊ शकेल?
निव्वळ शहरी भागांत सभा घेणं म्हणजे ग्रामीण भागात पोचणं नाही. मुंबई, ठाणे किंवा शहरी भागांपलिकडे महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्राचे प्रश्न तुम्हाला युवा नेतृत्व म्हणून समजून घ्यावे लागतील. त्या प्रश्नांबाबत भूमिका घ्यावी लागेल. आणि या लोकांच्या मागे आम्ही उभे आहोत हे दाखवावं लागेल. 'महाराष्ट्राचा नेता' व्हायचं असेल तर हा 'उर्वरित महाराष्ट्र' समजून घेऊन पुढे जावं लागेल. सगळंच आलबेल आहे असं नाही. पण लोक आज 'स्पेस' शोधत आहेत. पैसाच त्यांना महत्वाच्या वाटतोय असं नाहीये. आपल्या मागे उभा राहू शकेल अशा आश्वासक चेहऱ्याच्या शोधातही लोक आहेत. स्थानिक पातळीवर लोकांना असे चेहरे दिसले तिथं लोकांनी, त्यांच्या पारड्यात मतं टाकत त्यांना निवडून दिलंय. लोक ठाम भूमिका घेणाऱ्याच्या शोधात आहेत. शीर्षस्थ नेतृत्व म्हणून तुम्ही असं ठाम भूमिका घेणारं नेतृत्व उभं करताय ( ...की नेत्यांच्या मुला, मुलींचं कोंडाळं ) की, नाही हा मुद्दा आहे. ते केवळ 'शहरी विचार' करून होणारं काम नाही.
आज अनेक प्रश्न आहेत. जिथं लोक अस्वस्थ आहेत. तरुणांच्या प्रश्नांसंबंधीचं उदाहरण द्यायचं झाल्यास स्पर्धापरीक्षार्थी विद्यार्थ्यांचं देता येईल. या विद्यार्थ्यांचे काहीना काही मुद्दे असतात. कधी या प्रश्नांवर हे विद्यार्थी आंदोलनं करतात. या विद्यार्थ्यांना भेटून त्यांचे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी समजून घेतलेत, किंवा त्यासाठी दबावगट तयार केलाय अशा कुठेही बातम्या नाहीत. ट्विट करून मोकळं होणं हे प्रश्न समजून घेण्याचं माध्यम असू शकत नाही. याउलट आमदार रोहित पवार यांचं दिसतं. शहरांच्या पलिकडे जात उर्वरित महाराष्ट्रातले प्रश्न आदित्य ठाकरे समजून घेतायत असंही चित्र दिसत नाही. मागच्या महिन्यात नाशिकमधून आदिवासी आणि शेतकऱ्यांचा लाँग मोर्चा मुंबईच्या दिशेनं आला. दूर कशाला मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या आदिवासी पाड्यांवर सरकार कुऱ्हाड चालवत आहे. त्यावर आदित्य ठाकरेंनी काहीएक भूमिका घेतली असल्यास कळवावं. काही मुद्दे हे केवळ निवडणुकीतली अंकगणितं जुळवण्यापुरते असतात का? निवडणुका झाल्या की, कोशात जायचं. निवडणुकीच्या प्रचार काळात मतदारांना आठवायचं. हे चालू शकत नाही. 'गद्दार', 'खोके' वगैरे रटाळपणाही आता थांबवावा लागेल.
मुळात प्रत्येक प्रश्नाला राजकीय संदर्भ असतो. राजकारणात विचारपूर्वक स्ट्रॅटेजी ( लाँगटर्म चा विचार करून... ) आखाव्या लागतात. यश इन्स्टंट हाती लागण्याचं हे क्षेत्र नाही. तशी मानसिकता नेतृत्व म्हणून तुम्ही तयार करून घेणार असाल आणि मुळात हाच संदेश केडर पर्यंत जाणार असेल ( जाऊ देणार असाल ) तर लोक तुमच्यासोबत का थांबतील? मुळात का थांबावं? आपल्या मागे 'ठाकरे' नाव आहे म्हणून लोक सोबत राहतील, किंवा जोडली जातील या भ्रमात नेतृत्वाने राहता नये. तुम्हाला निराशा झटकून लोकांत उतरावं लागेल. लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील. त्यासाठी लोकांचं व्हावं लागेल. आज बलाढ्य राजकीय शक्ती तुमच्यासमोर आहे. सत्तेच्या माध्यमातून ती येनकेनप्रकारे तुम्हाला नामोहरम करायचा प्रयत्न करणारच आहे. त्यामुळे तिच्यासमोर टिकाव धरायचा असेल तर समोरच्या 'स्ट्रॅटेजी' ओळखा. त्याला 'टॅकल' करण्यासाठी स्वतःच्या स्ट्रॅटेजीत बदल करा. हे 'महाराष्ट्र' समजून घेतल्याशिवाय शक्य नाही. तिथेच 'संधी' सापडेल. 'बॉस' नव्हे त्यासाठी 'कॉमन मॅन' म्हणून पुढे यावं लागेल.
~ अक्षय शारदा शरद
Aditya Thackeray, Shiv Sena, Maharashtra Politics, Uddhav Thackeray, Eknath Shinde






