रामायण मालिकेचे निर्माते राजीव गांधी की रामानंद सागर ? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
X
मुंबई : १९८७-८८ च्या दरम्यान दूरदर्शनवर सर्वाधिक लोकप्रिय मालिका होती रामायण. या मालिकेच्या निर्मितीवरुन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलीय. दरम्यान, कोविडच्या काळात हीच मालिका पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर दाखविण्यात आली होती.
खासगी वाहिन्यांचं पेव फुटण्याआधी केंद्र सरकारच्या मालिकीची दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. या वाहिनीवर बातम्यांसह विविध मनोजरंजनात्मक आणि माहितीपर कार्यक्रम दाखवले जायचे. त्यामुळं १९८७-८८ च्या काळात दूरदर्शनवर ‘रामायण’ ही मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यातील भगवान रामाची भुमिका करणारे अरुण गोविल तर सार्वजनिक आयुष्यात कुठंही दिसले की लोकं त्यांच्या पाया पडायचे. इतकी लोकप्रियता या मालिकेनं कमावली होती. या मालिकेतील महत्त्वाचे प्रत्येक पात्र साकारणाऱ्या कलाकारांना लोकांनी अक्षरशः देवासम मानायला सुरुवात केली होती.
रामायण या लोकप्रिय मालिकेची निर्मिती ही प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते रामानंद सागर यांनी केली होती. त्यामुळं मालिकेच्या प्रसारणाचे सर्वाधिकार हे त्यांच्या सागर इंटरप्रायझेस या कंपनीकडेच होते. २५ जानेवारी १९८७ रोजी सुरु झालेली ही मालिका ३१ जुलै १९८८ रोजी बंद झाली. ७८ आठवड्यांची ही मालिका म्हणजे टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय मालिका ठरली.
राजीव गांधींच्या पुढाकारातूनच रामायण मालिका पुढं आली
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे एकदा कामकाज आटोपून घरी आले. त्यांनी टिव्ही लावला. त्याकाळी एकमेव वाहिनी होती आणि ती म्हणजे दूरदर्शन. त्यावरील कार्यक्रम पाहून राजीव गांधी काहीसे नाराज झाले. तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री व्ही.एन.गाडगीळ यांना त्यांनी फोन करुन दूरदर्शनवरील कार्यक्रमांबाबत नाराजी व्यक्त केली. दूरदर्शनला आपल्या कार्यक्रमांमध्ये विविधता आणावी लागेल, रामायण-महाभारतासारख्या पौराणिक ग्रंथांवर आधारित मालिका दाखवल्या पाहिजेत, असा सल्ला राजीव गांधींनी तत्कालीन मंत्री गाडगीळ यांना दिला. त्यानंतर तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री गाडगीळ यांनी याच खात्याचे सचिव एस.एस. गिल यांना पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अपेक्षा सांगितल्या. त्यानंतर गिल यांनी दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर या सर्व गोष्टी घातल्या. दरम्यान, खासगी निर्मात्यांना दूरदर्शनवर कार्यक्रम निर्मितीची योजना बनविण्यात आली. त्यातूनच पुढे रामानंद सागर यांना रामायण मालिका बनविण्याचं काम देण्यात आलं. या सर्व प्रशासकीय कामातून पुढं जात २५ जानेवारी १९८७ रोजी सकाळी ९ वाजता रामायण मालिकेचा पहिला भाग दूरदर्शनवर प्रसारित झाला. त्यामुळं राजीव गांधींच्या पुढाकारातूनच रामायण मालिका दूरदर्शनवर प्रसारित झाली, हे सत्य आहे.
रामायण मालिकेच्या निर्मितीचा नेमका वाद काय ?
रामायण या लोकप्रिय मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांच्या निधनानंतर रामायण मालिकेचे हक्क हे त्यांची सून निशा बेन सागर यांच्याकडे राहिले. दरम्यान, २०२० मध्ये कोरोनामुळं लॉकडाऊन लावण्यात आला. या काळात मनोरंजन क्षेत्रात नव्यानं निर्मिती पूर्णपणे थांबली होती. त्यामुळं रामायण ही मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा विचार पुढं आला. त्यातूनच रामायण या मालिकेचे नियमानुसार कॉपीराइट हे निशा बेन सागर यांच्याकडे होते. त्यामुळं दूरदर्शननं निशा बेन सागर यांच्या समोर रामायण मालिकेच्या पुनःप्रसारणासाठी प्रति एपिसोड २५ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर निशा बेन सागर यांनी दूरदर्शनला एक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी सांगितलं की, “ मला आनंदच होईल की, आजची मुलं राम-रामायणासंदर्भात जाणून घेतील, त्यामुळं तुम्ही मालिकेचं पुनःप्रसारण करा, मला कॉपीराइटसाठी एक पैसा देखील नको” अशा शब्दात निशा बेन सागर यांनी दूरदर्शनला रामायण मालिकेच्या पुनःप्रसारणाचे अधिकार विनामूल्य दिले.
दरम्यान, हिंदुत्ववादी विचारांची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वत्सला सिंह हिने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी निशा बेन सागर यांच्याविषयीची एक पोस्ट लिहिली. त्यात तिने रामायण मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांच्या सून निशाबेन सागर यांनी कोविड काळात एकही पैसा न घेता रामायण मालिकेच्या पुनःप्रसारणाचे अधिकार दिल्याचं सांगितलं. प्रति एपिसोड २५ हजार रुपयांची रक्कम नाकारणाऱ्या निशा बेन सागर यांचे पंतप्रधान मोदींनी फोनवरुन आभार मानल्याचं म्हटलंय. सनातन धर्म आपल्याला त्याग आणि शुद्ध आचरण शिकवत असल्याचं हे उदाहरण असल्याचंही वत्सला सिंह हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
दरम्यान, निशा बेन सागर यांच्यावरील या पोस्टला हा लेख लिहेपर्यंत २ लाख १६ हजार नेटिझन्सनी वाचलेलं आहे. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी वत्सला सिंह यांची हीच पोस्ट रिशेअर केली आहे. त्यामुळं वादाला सुरुवात झालीय.
लेकिन रामायण धारावाहिक बनवाया तो राजीव गांधी ने था । निशा सागर के त्याग के लिए उन्हें बहुत धन्यवाद https://t.co/c2BVO9TZgJ
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) February 24, 2026
राजीव शुक्ला यांनी वत्सला सिंह यांची पोस्ट रिशेअर करत लिहिलंय की, “ रामायण मालिकेची निर्मिती तर राजीव गांधींनी केली होती. निशा सागर यांना त्यांच्या त्यागासाठी धन्यवाद”. राजीव शुक्ला यांनी ही पोस्ट रिशेअर केल्यानंतर नेटिझन्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केलीय. दरम्यान, १९८७-८८ मध्ये दूरदर्शनवर दाखविण्यात आलेल्या रामायण या मालिकेच्या निर्मितीसाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे आग्रही होते, हे सत्य आहे. मात्र, त्यांनी प्रत्यक्षात या मालिकेची निर्मिती केलेली नाही.






