Home > News Update > 'राज्यपाल' की 'भाज्यपाल'?

'राज्यपाल' की 'भाज्यपाल'?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला वर्षपुर्ती होत असताना सरकार आणि राज्यपालांमधील वाद मात्र थांबायला तयार नाही. शपथविधीपासून सुरु झालेला वाद राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती आणि विद्यापीठांच्या परीक्षानंतर आता मंदीर उघडण्यापर्यंत येऊन पोचला आहे.

राज्यपाल  की  भाज्यपाल?
X

मुंबईः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत.

भाजप, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी मंदीर उघडण्यावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष करत असताना आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी या वादात उडी घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र लिहून मंदीरं उघडण्याची माणी केली आहे.

राज्यात एकाबाजूला सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहेत. तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच ठेवलं आहे. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे.

तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही आयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुख्मिणीचीही पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी, असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी या पत्राला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे त्यांच्या पत्रात म्हणतात, महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच.

करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी ' ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज्यपालांना जोरदार प्रत्युत्तर देत ठाकरे म्हणतात, महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही .

Have you suddenly turned 'Secular' yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा 'Secularism' आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मंदीर प्रवेशावरुन राज्यभर घंटानाद आंदोलन करणा-या भाजपालाही मुख्यमंत्र्यांनी फटकारले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तीनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो. असं सांगत मुख्यमंत्र्यांनी जय हिंद , जय महाराष्ट्र म्हणत पत्राचा शेवट केला आहे.



Updated : 13 Oct 2020 10:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top