Home > News Update > एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार? : सचिन सावंत

एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार? : सचिन सावंत

कंगना मुंबईत आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करुन एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार? : सचिन सावंत
X

बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन प्रकरणी एनसीबीने मागील तीन चार महिन्यात कलाकार व त्यांच्या संबंधित अनेकांची चौकशी केली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडिओवरून एनसीबी चौकशी करत आहे. हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा आहे, त्यावेळी फडणवीस सरकार होते त्यावेळी चौकशी केली नाही. तर काहींच्या घरी औषधं सापडली त्यांचीही चौकशी केली. बॉलिवूडला जाणीवपूर्वक दहशतीखाली ठेवण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे. तर स्वतः ड्रगचे सेवन करणारी व दुसऱ्यांना जबरदस्तीने ड्रग घेण्यास भाग पाडणाऱ्या कंगणा रनौटला मात्र आजपर्यंत एनसीबीने चौकशीला बोलावले नाही. आता ती पुन्हा मुंबईत आलेली आहे त्यामुळे कंगणाला चौकशीसाठी कधी बोलावणार हे एनसीबीने सांगावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सांवत यांनी केली आहे. एनसीबीने कंगणाची चौकशी करावी अशी मागणी सावंत यांनी यापूर्वीही अनेकदा केलेली आहे.

यासंदर्भात बोलताना सांवत म्हणाले की, कंगणाने स्वतः ड्रग्ज घेत असल्याची कबुली देणारा एक व्हीडिओ अनेक महिन्यांपासून व्हायरल झालेला आहे, तिचा एक मित्र अद्ययन सुमन यांनीही कंगणा ड्रग घेण्यास भाग पाडत होती तोही व्हिडिओ जगजाहीर आहे. बॉलिवूडमधील ड्रग संदर्भात आपल्याकडे माहिती असून ती आपण देऊ असेही कंगणाने जाहीरपणे सांगितले होते. असे असताना एनसीबी त्याकडे गांभिर्याने का पहात नाही आणि तिला चौकशीसाठी का बोलावत नाही. कंगणाला मोदी सरकारने पुरवलेली वाय दर्जाची सुरक्षा आजही तिला आहे. या सुरक्षेचा खर्च जनतेच्या पैशातून होतो, तो वाया जात आहे.

कंगणाची पाठराखण करणारे भारतीय जनता पक्षाचे लोकही याविषयावर आता गप्प आहेत. राम कदम यांनी कंगणाची तुलना झाशीच्या राणीशी केली होती. ड्रग संदर्भात कंगणाकडील माहिती बाहेर आल्यास अनेकांचे पितळ उघडे पडेल म्हणून महाविकास आघाडी सरकार ती माहिती उघड होऊ देत नाही असा आरोपही राम कदम यांनी केला होता. एवढी महत्वाची माहिती दडवणे हाही गुन्हाच आहे. त्यामुळे राम कदम यांनी कंगणाला तिच्याकडे असलेली माहिती एनसीबीला देण्यास सांगावे. या संपूर्ण प्रकरणात भाजपाने कंगणाला साथ देत महाराष्ट्राची बदनामी केली. कंगणाचा बोलवता धनी भाजपा आहे हेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजपण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपाने महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे, असेही सावंत म्हणाले.



Updated : 30 Dec 2020 8:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top