Home > News Update > Rahul Gandhi : राहुल गांधींच्या केंब्रिज विद्यापीठातील भाषणाची सर्वत्र चर्चा...

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या केंब्रिज विद्यापीठातील भाषणाची सर्वत्र चर्चा...

राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना केंब्रिज विद्यापीठामध्ये भाषण देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या या भाषणाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. या भाषणात राहुल गांधी यांनी 'पेगासस स्पायवेअर' चा उल्लेख केला आहे. या प्रकरणामुळे केंद्रातील मोदी सरकार अडचणीत आले होते. नेमके हे प्रकरण काय आहे. आणि राहुल गांधी आपल्या भाषणात काय म्हणाले ते वाचा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर...

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या केंब्रिज विद्यापीठातील भाषणाची सर्वत्र चर्चा...
X

जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठामध्ये (Cambridge University) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या भाषणाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भारतीय लोकशाही संकटात असल्याचा उल्लेख केल्यामुळे सर्वत्र हा विषय चर्चीला जात आहे. तसेच राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मूळच्या इस्त्रालयमधील कंपनीने तयार केलेल्या पेगासस (Pegasus) या स्पायवेअरचाही (Spyware) उल्लेख केला. त्यामुळे एकच खळबळ माजी होती. गेल्यावर्षी पेगासस या स्पायवेअरमुळे मोदी सरकारवर विरोधकांनी सडकून टिका केली होती. या स्पायवेअरमुळे देशातील महत्त्वाचे नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अशातच राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणामुळे पेगासस स्पावेअरचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या भाषणामध्ये यावेळी सांगितले की, माझ्या मोबाईलमध्ये पेगासस स्पायवेअर आहे. अशी माहिती मला गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मला कळले की, माझ्या मोबाईलमध्ये पेगासस स्पायवेअर आहे. तो पर्यत मला याची माहिती नसल्याचे राहुल गांधी सांगितले. गुप्तचर अधिकाऱ्यांनी मला जी माहिती दिली त्यामध्ये माझा फोन रेकॉर्ड होत आहे आणि फोनवर बोलताना काळजी घ्या व तुम्ही सुद्धा काळजी घ्या असे सांगितले. असे राहुल गांधी यांनी आपल्या केब्रिज येथे केलेल्या भाषणात सांगितल्याने एकच खळबळ माजली.

पेगासस या स्पायवेअरची निर्मिती मूळच्या इस्त्रालयमधील एनएससो या सायबर सुरक्षेवर काम करणाऱ्या कंपनीने केलेली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने भारतात काही पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर स्पायवेअरच्या मदतीने पाळत ठेवली जात आहे, असा दावा केला होता. मात्र हा दावा करताना व्हॉट्सअॅपने कोणाचेही नाव उघड केले नाही. खऱ्या अर्थाने २०१९ मध्ये पेगासस हे स्पायवेअर पहिल्यांदा चर्चेत आले होते. त्यानंतर २०२१ ला म्हणजे दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही माध्यम संस्थांनी सोबत येत पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला होता. जवळपास देशातील ३०० महत्त्वाच्या व्यक्तींवर ही पाळत ठेवण्यात आली होती. यामध्ये दोन केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षातील काही नेते, काही महत्त्वाच्या दर्जाचे अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपतींचा यामध्ये समावेश होता. असा दावा माध्यम संस्थांनी केला होता. अशी माहिती राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात दिली.

पेगासस स्पायवेअरसंदर्भात चौकशी करण्याची मागणी त्यावेळी विरोधी पक्षांनी केली होती. माध्यम संस्थांनी केलेल्या दाव्यानंतर या चौकशीची मागणी विरोधकांनी केली होती. तर दुसरीकडे मोदी सरकारने त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र या संदर्भात कोणतीही ठोस आणि वस्तुनिष्ठ माहिती केंद्र सरकार देवू शकलेले नाही. तसेच दुसरीकडे केंद्र सरकारने आम्ही पेगासस या स्पायवेअरचा वापर केला नसल्याचे सांगितले आहे. स्पायवेअर हे झिरो क्लिक अटॅक पद्धतीने काम करते, ते मोबाईलवर कोणतीही लिंक पाठवत नाही, आणि तुमच्यावर पाळत ठेवू शकते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. यासाठी मोबाईलवर कोणतीही लिंक पाठवण्याची गरज लागत नाही. लिंक पाठवती सुद्धा स्पायवेअर तुमच्यावर पाळत ठेवू शकते. पेगासेस स्पायवेअर मोबाईमध्ये एकदा इन्स्टॉल झाले, की ते आपले काम सुरु करते. हे स्पायवेअर आपल्या ऑपरेटरला टेक्स्ट मॅसेज, लाईव्ह व्हाईस कॉल्स, कॅलेंडर इव्हेंट्स, कॉन्टॅक्ट लिस्ट, मोबाईलमधील पासवर्डस, खासगी माहिती सुद्धा ऑपरेटरला पुरवते.

ऑक्टोबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी न्यायालयाने न्यायमूर्ती आर.व्ही. रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. मात्र या चौकशी समितीला कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी आपल्या निकालात सांगितले. शेकडो फोनवर पेगासस मार्फत पाळत ठेवली जात असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र चौकशी दरम्यान चौकशी समितीला फक्त २९ मोबाईलच हाती लागले होते. आणि त्या २९ मोबाईलच्या तपासात काहीच निष्पन्न होवू शकले नाही. २९ मोबाईलपैकी पाच मोबाईलमध्ये मालवेअर (Malware) आढळले असल्याचे चौकशी समितीने सांगितले होते. मात्र मालवेअर म्हणजेच पेगासस आहे, हे कुठेही चौकशी समितीला सिद्ध करता आले नसल्याचे तांत्रिक चौकशी समितीने सांगितले. त्यामुळे हे प्रकरण नक्की होते की फक्त हवा होती, हे अद्यपही कळू शकलेले नाही. मात्र पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी या प्रकरणावर केंब्रिज विद्यापिठामध्ये भाष्य केल्याने हा मुद्दा भारताच्या राजकीय वर्तुळात याचे काय परिणाम पाहायला मिळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Updated : 6 March 2023 2:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top