“विकास दुबेवर राजकीय वरदहस्त”
X
आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला उत्तर प्रदेशातील गुंड विकास दुबे याला पोलिसांनी अटक केलेली आहे. पण विकास दुबेवर राजकीय वरदहस्त आहे असा गंभीर आरोप शहीद झालेल्या जितेन्द्र कुमार या पोलिसाच्या भावाने केलेला आहे.
एवढेच नाही तर विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांचे एन्काऊंटर केले पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना मदत करणाऱ्या पोलीस कर्मचार्यांजचे देखील एन्काउंटर केले पाहिजे अशी मागणी देखील जितेंद्र कुमार यांचे भाऊ झहेंद्र पाल यांनी केलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कर्फ्यू असतानादेखील विकास दुबे मध्यप्रदेश पर्यंत कसा पोहोचला, असा सवाल उपस्थित करत दुबेवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांचं पथक जाणार आहे, अशी माहिती त्याला दिल्याप्रकरणी चौबेपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी विनय तिवारी आणि केके शर्मा या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक कुनवरपाल, कृष्णकुमार शर्मा आणि पोलीस हवालदार राजीव यांनी देखील विकास दुबेला याबाबत अधिक माहिती दिली होती, असे आढळल्याने या तिघांनाही निलंबित करण्यात आलेले आहे.
विकास दुबेला मध्यप्रदेशातून ताब्यात घेतल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस रात्री उशिरा त्याला कानपूरला घेऊन आले आहेत. त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान विकास दुबे याची पत्नी आणि मुलाचीदेखील पोलिसांनी चौकशी केलेली आहे.