Home > News Update > 'शेजाऱ्यांना चहा पाजून पंतप्रधान मोदींचे आभार माना' , केंद्रीय राज्यमंत्री दानवेंचा अजब सल्ला

'शेजाऱ्यांना चहा पाजून पंतप्रधान मोदींचे आभार माना' , केंद्रीय राज्यमंत्री दानवेंचा अजब सल्ला

शेजाऱ्यांना चहा पाजून पंतप्रधान मोदींचे आभार माना , केंद्रीय राज्यमंत्री दानवेंचा अजब सल्ला
X

जालना // 'आपली बोलीभाषा आणि गावरान भाषणामुळे नेहमीच चर्चेत राहणारे केंद्रीय रेल्वे, कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी कहरच केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देण्यासाठी दानवेंनी बँक ठेवीदारांना चक्क शेजाऱ्यांना चहा पाजण्याचा अजब सल्ला दिला आहे.

दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना जिल्ह्यातील अर्जून जाधव व सत्यभामा जाधव या ठेवीदारांना विम्याच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. तर जालना येथे ठेवीदारांना प्रतिनिधिक स्वरूपात केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला, यावेळी रावसाहेब दानवेंनी आपल्या खास शैलीत भाषण केले.

मंठा सहकारी बँकेतील 28 हजार 536 खातेदारांना विम्याची रक्कम मंजूर झाली असून 27 हजार 534 खातेदाराच्या खात्यात सुमारे 37 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे, हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले. मोदींनी गरिबाच्यापोटी जन्म घेतला म्हणून त्यांना गरिबांची जाण आहे. तुमचे बुडालेले पैसे मिळाल्याबद्दल घरी जाताच शेजाऱ्यांना आणि मित्र मंडळींना चहा पाजून मोदींचे आभार माना असा अजब सल्ला राज्यमंत्री दानवे यांनी ठेवीदारांना दिला.

तर, सर्वसामान्य व्यक्ती आपल्या भविष्यासाठी काबाडकष्ट करून पुंजी बँकांमध्ये ठेवतो, परंतु बँक अडचणीत आल्यास ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नाही आणि याच विचाराने तो हतबल होतो. अशा ठेवीदारांनी सहकारी बँकांत ठेवलेल्या ठेवींवर डीआयजीसीजी (डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) यांच्यामार्फत विमा काढण्यात येतो. यापूर्वी केवळ 50 हजार व एक लाख रुपयांचा विमा काढण्यात येत होता. परंतु यामध्ये सप्टेंबर 2021 मध्ये सुधारणा करत विमा रकमेची रक्कम पाच लाख रुपयापर्यंत करण्यात आली असल्याचे सांगून संपूर्ण देशभरात 18 ठिकाणी आजच्या दिवशी ठेवीदारांना विमा रकमेचे वितरण करण्यात आल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले.

Updated : 13 Dec 2021 1:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top