Home > News Update > रायगड जिल्ह्यात विकासकाची दहशत, विकासक दाखवतोय पिस्तुलाचा धाक...

रायगड जिल्ह्यात विकासकाची दहशत, विकासक दाखवतोय पिस्तुलाचा धाक...

रायगड जिल्ह्यात विकासकाची दहशत, विकासक दाखवतोय पिस्तुलाचा धाक...
X

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात दिवसेंदिवस औद्योगिकीकरण, उद्योगधंदे आणि नवनवीन प्रकल्प झपाट्याने विकसित होत आहेत. त्यामुळे येथील जागेची किंमत चांगलीच वाढली आहे. याबरोबरच अतिक्रमण व अवैध्य बांधकाम देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याचे चित्र पाहायला मिळतयं. कळंब ग्रामपंचायत हद्दीतील मुळशी आणि कौलोशी आदिवासीवाडी येथील शेतजमीन व पूर्वांपार वहिवाट, शेती तसच नदीवर जाणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

संतोष कोलते आणि वसंत सालियान यांनी सदर प्रकल्पाचे काम करताना ग्रामस्थांच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केलं असल्याची तक्रार रायगड जिल्हाधिकारी आणि सुधागड तहसीलदार पाली यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. "येथील विकासक पिस्तुलाचा धाक दाखवत असल्याने आदिवासी बांधव भीतीच्या सावटाखाली आहेत. पिस्तुलच्या धाकामुळे आदिवासींची मुलं बऱ्याच दिवसापासून भीतीने शाळेत जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले."

सदरचे अतिक्रमण हटवून पिढ्यानपिढ्या असलेले पारंपारिक वहीवाटीचे रस्ते रहदारीसाठी मोकळे करावेत, अन्यथा विकासकविरोधात तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मागील अनेक पिढ्यांनी ज्या रस्त्याचा वापर येण्या-जाण्यासाठी केला तोच रस्ता विकासकामाने अडविला असल्याची मत येथील आदिवासी महिलांनी व्यक्त केलीत. तसेच या भागात पर्यायी रस्ता नसल्याने पुढील काळात ग्रामस्थांचे प्रचंड हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. येथील विकासकामासाठी अंदाजे ५० ते ६० एकर शेतजमीन खरेदी केलेली असून सदर जमिनीवर मागील चार ते पाच महिन्यांपासून जे.सी.बी, डंपर, पोखलन इत्यादी साहित्याच्या सहाय्याने जागा विकसित करण्याचे काम सुरू केले आहे.

शेतकऱ्यांच्या मिळकतीवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर शेतजमिनीचे नुकसान केले असल्याचे ग्रामस्थांनी म्हटंल आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामस्थ गेले असता विकासक व त्याच्या कर्मचारी यांच्याकडून ग्रामस्थांना धमक्या दिल्या जात असून ग्रामस्थांवर खोटे आरोप करून गुन्हे दाखल केले जात असल्याच ग्रामस्थांनी स्पष्ट केलं.

ग्रामस्थांच्या शेतजमिनीवर जाणारे रस्ते अडविण्यात आलेत, नदीवर गुरांना पाणी पिण्यासाठी जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना नदीवर जाणे-येणे देखील कठीण झाले आहे. वहीवाटीचा अंदाजे सहा फुटीच्या रस्त्यावर सिमेंट व दगडी कंपाऊंड बांधले जात असल्याने आमच्या हक्काच्या जागेवर गदा आणली जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटंल आहे. कळंब ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग आखाडे यांनी येथील ग्रामस्थांवर विकासकाकडून अन्याय होत असल्याचे सांगत ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उभे करणार असल्याचा इशाराही दिला आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घोषणाबाजी करुन अतिक्रमण लवकरात लवकर न हटविल्यास मनसेच्या वतीने पाली तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा सुधागड तालुकाध्यक्ष सुनिल साठे यांनी दिला. याप्रसंगी मुळशी, कौलोशी, आणि कळंब ग्रामस्थ आदिवासी कातकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सुधागड तालुक्यातील मुळशी व कौलोशी ग्रामस्थ व आदिवासी बांधवांनी येथील विकासकाकडून पारंपरिक रस्ते अडवून मालकीच्या जागांवर अतिक्रमण केले असल्याचे तक्रारी निवेदन दिले आहे. "त्यानुसार वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी तसेच प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यासाठी आम्ही जाणार, त्यानंतर आवश्यक कागदपत्रे तपासून आणि अनभिज्ञ माहिती घेउन कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिलं आहे."

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/640651560008359/

Updated : 12 Jan 2020 5:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top