Home > News Update > नथुराम गोडसे ची स्तुती करणाऱ्यांना वरुण गांधींनी फटकारले

नथुराम गोडसे ची स्तुती करणाऱ्यांना वरुण गांधींनी फटकारले

नथुराम गोडसे ची स्तुती करणाऱ्यांना वरुण गांधींनी फटकारले
X

अहिंसा आणि सहिष्णुतेचे धडे शिकवणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पुन्हा एकदा गांधींच्या मारेकऱ्यांचे कौतुक करणाऱ्या पोस्ट आणि ट्वीटला उधाण आलं होतं. या ट्वीटच्या विरोधात भाजप नेते वरुण गांधी यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

वरुण गांधी हे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, "भारत नेहमीच एक आध्यात्मिक महासत्ता राहिला आहे. पण महात्माजींनी आम्हाला त्या आध्यात्मिकतेच्या आधारावर ती नैतिक शक्ती दिली, जी आजही आमची सर्वात मोठी ताकद आहे. जे लोक गोडसे जिंदाबादचे ट्वीट करत आहेत ते अत्यंत बेजबाबदार पद्धतीने देशाला लाजवत आहेत." अशा शब्दात वरुन गांधी यांनी या लोकांवर निशाणा साधला आहे.

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस...दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला महात्मा गांधींचा शांतीचा संदेश लक्षात ठेवण्याचे आवाहन केले. तसेच ते म्हणाले, जगभरातील लढवय्यांनी त्यांची हत्यारं खाली टाकायला हवी. प्रत्येकाने मानवतेचा शत्रू, कोविड -19 साथीचा पराभव करण्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.

2 ऑक्टोबर ला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त बोलतांना सरचिटणीस म्हणाले की, महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आपण आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करतो हा योगायोग नाही.

पुढे ते म्हणतात, "गांधींसाठी, अहिंसा, शांततापूर्ण प्रदर्शन, सन्मान आणि समानता हे केवळ शब्द नव्हते तर मानवतेसाठी मार्गदर्शक होते, चांगल्या भविष्यासाठी ती एक ब्लूप्रिंट होती. अहिंसा, शांततापूर्ण निषेध, सन्मान आणि समानता आजच्या संकटाच्या काळातही समस्यांवर मात करण्याचा मार्ग दाखवतात. असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

Updated : 3 Oct 2021 7:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top