एसटी कर्मचारी संप : सरकारचा अल्टिमेटम, सोमवारपर्यंतची मुदत
X
गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल राज्य सरकारने पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह काही मागण्या मान्य केल्या आहेत. पण आता कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करत सरकारने आतापर्यंत १० हजार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पण आता सरकारने पुन्हा एकदा एक पाऊल मागे घेत निलंबनाची कारवाई मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. मात्र त्यासाठी ज्या कामगारांना निलंबित करण्यात आले आहे त्यांनी सोमवारपर्यंत कामावर यावे, असा अल्टिमेटम परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
अनिल परब यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत कारवाईची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. आपण राज्यातील सर्व वरिष्ठांशी बोललो आहोत, त्य़ांनी माहिती दिल्याप्रमाणे, कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे. पण काही लोक कामावर येऊ देत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. तर काही जण निलंबित असल्याने त्यांना कामावर येता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, तसेच त्या कर्मचाऱ्यांना एक संधी दिली पाहिजे, असेही सांगितल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे जे कामगार सोमवारपर्यंत आपल्या कामावर येतील, त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल. ज्या डेपोंमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम सुरू आहे तिछे त्यांना काम देण्यात येईल, तर काहींना इतर डेपोंमध्ये सामावून घेतले जाईल अशीही माहिती परब यांनी दिली आहे.
तसेच सोमवारीपर्यंत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर पुढे कठोर आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही परब यांनी दिला आहे. पुढे कामावर घेतले नाही तर आत्महत्या करतो असे होऊ नये सेच सरकारने संधी दिली नाही असे होऊ नये म्हणून सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे, असेही परब यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारनंतर कामागारांवर कायदेशीर कारवाई सुरू होईल, त्यात आधी निलंबन मग त्यानंतर कर्मचाऱ्यांची चौकशी आणि त्यानंतर बडतर्फ करायचे की सेवेत घ्यायचे याच्याबद्दल प्रशासन निर्णय घेईल असेही परब यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला असला तरी सोमवारपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही, असे परब यांनी सांगितले आहे.






