Home > News Update > राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा बिगूल वाजला, 608 ग्रामपंचायतीसाठी आचारसंहिता लागू

राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा बिगूल वाजला, 608 ग्रामपंचायतीसाठी आचारसंहिता लागू

स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि पावसामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींसाठी आचारसंहिता लागू केली आहे.

राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा बिगूल वाजला, 608 ग्रामपंचायतीसाठी आचारसंहिता लागू
X

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे रद्द झालेल्या आरक्षणावरची सुनावणी आणि पावसाळ्यात पावसामुळे निवडणूक प्रक्रीयेत अडचणी येण्याची निर्माण झालेली शक्यता यांमुळे निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचात निवडणूका जाहीर केल्या आहेत. तर त्यासाठी 12 ऑगस्टपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी शुक्रवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तर 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांनी दिली.

राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कसा असेल ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम-

  • 18 ऑगस्ट रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्यात येईल.
  • 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर- नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी (27,28 व 31 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्ट्यांमुळे नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.
  • 2 सप्टेंबर- नामनिर्देशनपत्रांची छाणणी
  • 6 सप्टेंबर दुपारी 3 वा. पर्यंत- नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील.
  • 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल
  • 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी
  • ओबीसी आरक्षणासंदर्भात समर्पित आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीनुसार मागास प्रवर्गासाठी जागा देण्यात येतील.

कोणत्या तालुक्यातील किती ग्रामपंचायती?

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: नंदुरबार: शहादा- 74 व नंदुरबार- 75. धुळे: शिरपूर- 33. जळगाव: चोपडा- 11 व यावल- 02. बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 व लोणार- 02. अकोला: अकोट- 07 व बाळापूर- 01. वाशीम: कारंजा- 04. अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 व चांदुर रेल्वे- 01. यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरगाव- 11 व झरी जामणी- 08. नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, व देगलूर- 01. हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 व पालम- 04. नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 व नाशिक- 17. पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02. अहमदनगर: अकोले- 45. लातूर: अहमदपूर- 01. सातारा: वाई- 01 व सातारा- 08. व कोल्हापूर: कागल- 01. एकूण: 608

Updated : 12 Aug 2022 6:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top