Home > News Update > विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा थाटात संपन्न...

विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा थाटात संपन्न...

विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा थाटात संपन्न...
X

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये आज वसंत पंचमीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा अतिशय भक्तिमय आणि जल्लोषात पार पडला. भक्तिगीतांवर तल्लीन झालेल्या हजारो भाविकांनी अवर्जून हजेरी लावून अक्षता टाकल्या.

श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा वसंत पंचमीला विवाह झाल्याची आख्यायिका आहे. या संदर्भाने श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे दर वर्षी मंदिरामध्ये श्री विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मंदिराला आज आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. विवाहासाठी श्री रुक्मिणीमातेकडून देवाला पांढरा पोशाख आहेर म्हणून पाठविला जातो. तर श्री रुक्मिणीमातेला देवाकडून पैठणी पाठविली जाते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता अक्षता सोहळा पार पडला. लग्न बोहल्यावर देवाच्या प्रातिनिधिक मूर्ती उभ्या केल्या जातात व दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हटल्या जातात. आणि लग्न पार पाडले जाते.

या लग्न सोहळ्यानंतर मंदिर समितीच्या वतीने वऱ्हाडींना दिवसभर जेवणाच्या पंगतीचे आयोजन केलेले असते. लग्नाचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता शहरातून मिरवणूक काढण्यात येते. आजपासून रंगपंचमीपर्यत देवाला दररोज पांढरा पोशाख घातला जाणार आहे आणि या पोशाखावर रोज केशर पाणी आणि गुलाल टाकण्याची परंपरा आहे. या सोहळ्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून भागवताचार्य अनुराधा शेटे यांचे श्री रुक्मिणी स्वयंवर हे कथानक ठेवण्यात आले आहे.

Updated : 26 Jan 2023 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top