सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली, अमृता फडणवीसांच्या 'त्या' ट्विटला शिवसेनेचं उत्तर
X
केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आता शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी उत्तर दिले आहे.
“इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!” असं म्हणत अमेय घोले यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
राहुल गांधी यांनी ‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान केलं होतं. या विधानावर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी जोरदार टीका केली होती.
आणि आता हाच मुद्दा पकडत, फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी, त्याचप्रमाणे केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटूंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते” अशी टीका ट्विटरद्वारे केली होती. त्याला शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी उत्तर दिले आहे.
इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो! #ठाकरेठाकरेच! #आजच्याआनंदीबाई https://t.co/5GWTWJaCe6
— Amey Ghole (@AmeyGhole) December 22, 2019