शिक्षक भरतीत ओबीसीची कपात थांबवा अन्यथा उग्र आंदोलन करू: प्रा. लक्ष्मण हाके
X
ओबीसी, एनटी , व्हीजेएनटी, एसबीसी, प्रर्वगातील मुलां-मुलींना देखील MPSC , UPSC साठी मोफत प्रशिक्षण द्यावे. त्याचबरोबर एम फिल पीएचडी साठी मानधन मिळावे, व्यावसायिक कोर्सेस ना विद्यार्थ्यांना बंद केलेली शिष्यवृत्ती सुरू व्हावी. यासाठी ओबीसी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रात 15 जुलै 2020 रोजी धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे धनगर समाजाचे नेते आणि ओबीसी संघर्ष सेनेचे प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
काय आहे मागणी?
महाज्योती ला तात्काळ 1000 कोटी रुपये निधी द्यावा.
93 व्या घटना दुरुस्ती प्रमाणे ओबीसीसाठी MBBS व MD साठी 27% आरक्षण कायम ठेवावे. गेल्या तीन वर्षांपासून 11,000 पेक्षा जास्त जागा ओबीसी विद्यार्थ्यांच्या डावलल्यामुळे ओबीसी आरक्षण संपविण्यात येत आहे.
शिक्षकभरती प्रक्रियेत केंद्राचे आर्थिक मागास आणि बिंदूनमावलीचा बागुलबुवा उभा करून फक्त मागासवर्गीयांचीच ( St, Sc, Obc, Nt, Sbc प्रवर्गातील ) 50% रिक्त जागा बेकायदेशीर पणे कपात केलेल्या आहेत. या जागा कपात केल्याने मागासवर्गीय विद्यार्थी बळी जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय मिळावा. अशी मागणी या संघटनाने केली आहे.
या आणि अशा अनेक मागण्यासाठी, आपला असंतोष व्यक्त करावा. हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी उद्या 15 जुलै रोजी Virtual आणि Social Media च्या माध्यमातून, निवेदने द्यावीत, धरणे आंदोलन करण्यात यावे, जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयात निवेदने देण्यात येणार आहेत.
संचारबंदी असेल आणि शक्य नसेल तर सरकारला ऑनलाईन निवेदने देण्यात येणार आहेत. असे हाके यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितले. ओबीसी विदयार्थी कृती समिती, ओबीसी संघर्ष सेना आणि जातसमूह भटके विमुक्त जाती जमातीच्या संघटना या आंदोलनात सहभागी होत आहेत.