पवार साहेबांचे बोलके 'भक्त' !
Kamlesh Sutar | 31 Aug 2019 7:47 PM IST
X
X
पत्रकार परिषदेत चिडलेल्या शरद पवारांची बाजू घेणाऱ्या आणि त्यांना टोकाचा विरोध करणाऱ्या काही पोस्ट वाचण्यात येत आहेत. पवार चुकले की प्रश्न विचारणारा तो पत्रकार चुकला? ही चर्चा खरं तर सुरू झाली हे एकअर्थी बरेच झाले.
तर, शरद पवारांची बाजू मांडायला अनेकजण (पक्षी : पत्रकार) आपली पाजळत आहेत. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. महाराष्ट्रात सर्व थरातील "भक्त कल्ट" सुरू करणारे आद्य कोण? तर, साक्षात साहेबच. ज्याकाळी सोशल मीडिया नव्हता, अगदी त्याकाळीही साहेबांची तळी उचलून धरण्याचे प्रताप काही पत्रकार करत आले आहेत .. उदाहरणार्थ - महाराष्ट्रातल्या राजकारणात काहीही उलथापालथ झाली की, या मागे कसा साहेबांचाच हात आहे अश्या आशयाच्या बातम्या यायच्या. एकदा तर त्यांचा एक सहकारी पक्ष सोडून जात असताना, त्याचा दुसऱ्या पक्षातील प्रवेश साहेबांनीच कसा ऐनवेळी थांबवला अशी चमचमीत बातमी फ्रंट पेजला या बहद्दरांनी छापली होती. संजय पवार यांनी 'गरज राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्राची' हा लेख लिहिला. तर एका पत्रकाराने राष्ट्रवादीच्या कार्यालयातच "दोन-चार एकांकिका लिहिणाऱ्या संजय पवाराची लायकी काय?" असा खडखडाट केलेला मी याची देही याची डोळा पाहिलाय. पवारांनी न मागता राज्यातल्या भाजप सरकारला दिलेला पाठींबा, यावर प्रश्न उभे करण्याऐवजी हा सुद्धा कसा साहेबांचा 'गेमप्लॅन' आहे ही थियरी असो किंवा नोटबंदीच्या दुसऱ्याच दिवशी पवारांनी मोदींवर उधळलेली स्तुतीसुमने असोत, साहेबांच्या भक्तांनी यामागेही पुन्हा सोयीचं लॉजिक दिलंय.
आता तर कहरच झालाय. भाजपवाले ट्रोल्स करताना लॉजिकसाठी एक पद्धत नेहमी वापरतात. ती म्हणजे, "Whataboutery" अर्थात, एखाद्याने आरोप केला तर त्याला उत्तर न देता उलट आरोपच करणे. (उदा. नेहरूंनी केले तेव्हा का काही नाही म्हणालात , आज मोदींना का विचारताय? वगैरे). आज अनेक पवारभक्तांनी तेच करत, मुख्यमंत्र्यांना, मोदींना का नाही असे धारधार प्रश्न विचारत वगैरे वगैरे लॉजिक मांडलेय. पवारांचं समर्थन करणाऱ्या या लॉजिकमध्ये, मोदी भक्तांची whatabouteryची तऱ्हाच प्रकर्षाने दिसून येते.
त्याआडून पत्रकाराने विचारलेला प्रश्नच चूक असल्याचे ठरवण्याची चढाओढ लागली आहे. प्रश्न विचारणारा कुणाचा समर्थक आहे हे ही तपासलं जात आहे. मुळात प्रश्न चुकीचा नव्हता असं मला व्यक्तिशः वाटतं, आणि जरी पवार साहेबांना तो चुकीचा वाटत असला, तरी त्याचे उत्तर "तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असावी, किंवा इतकं राजकारण मला कळत नाही", असं नेहमीसारखं बोलत देणं त्यांना सहज शक्य होतं. पत्रकाराला परिषदेतून निघून जायला सांगणे हा पर्याय नक्कीच नव्हता.
पूर्वी म्हणजे साहेबांच्या काळात, पत्रकार परिषदेत 'असे काही' प्रश्न आले तर काही ठराविक पत्रकार, खरिपाची लागवड किंवा रब्बीच्या हंगामातील पिकं असा काहीसा 'ऑफ बिट' प्रश्न विचारून अख्खी पत्रकार परिषद डायव्हर्ट करायचे, पंक्चर करून टाकायचे. त्यावेळी, सोशल मीडियावर नसले तरी प्रत्यक्षात वावरणाऱ्या या भक्तांना माझ्यासहित अनेकांनी पाहिले आहे.
राजकारणात व्यक्तिपूजा न टाळता येणारं सत्य आहे. भक्त, मग ते कुठल्याही बाजूचे असू देत, तुमच्या बऱ्या काळात ते तुम्हाला larger than life बनवतात तर चुकल्यानंतर तुमच्या चुकांवर येनकेनप्रकारेण पांघरूण घालतात. दोन्ही प्रकार चूकच.
कमलेश सुतार यांच्या फेसबुक वॉलवरून साभार
Updated : 31 Aug 2019 7:47 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire