राज्याचे ऊर्जामंत्री नेमकी कोणत्या घरी राहातात हेच समजत नाही,अन्यथा त्यांच्या घरावर मोर्चा नेला असता- लांबे
X
राहुरी : 'राज्याचे ऊर्जामंत्री नेमकी कोणत्या घरी राहातात हे समजत नाही, कधी ते मुंबईच्या घरी असतात, कधी पुण्याच्या तर कधी त्यांचा मुक्काम सासुरवाडीत असतो, त्यामुळे आज रस्त्यावर उतरून रास्ता रोको करावा लागला, मात्र , रास्तारोको करताना आम्ही रुग्णवाहीका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अडवले नाही. पुढच्या वेळी मंत्री महोदय नेमके कोणत्या घरी मुक्कामी आहेत याचा शोध लागला तर नक्कीच पुढचा मोर्चा त्यांच्या घरावर नेऊ असं प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश लांबे यांनी म्हटले आहे.यावेळी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर लांबे यांनी जोरदार घणाघात केला.
शेतीपंपाची चालू असलेली सक्तीने वीज बिलवसुली तात्काळ थांबवावी, शेतीपंपाचे संपूर्ण बिल माफ करावे याकरिता राहुरी शहरात प्रहार जनशक्ती पक्ष आणि विविध सामाजिक संघटना यांच्यावतीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रास्ता रोको करण्यात आला यावेळी लांबे बोलत होते.
यावेळी प्रहारच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार फसियोद्दीय शेख , पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्याकडे देण्यात आले आहे. दरम्यान लांबे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, जरी आमचे पक्ष प्रमुख महाविकास आघाडीत मंत्री असले तरी जिथे जिथे अन्याय असेल तिथे 'प्रहार' करण्याची शिकवण आम्हाला बच्चूभाऊ कडू यांनी दिली आहे त्यामुळे आम्हाला आज रास्तारोको करावा लागला असं लांबे म्हणाले.
आज सोमवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर-मनमाड राज्य महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश लांबे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटनेच्यावतीने हा रास्ता रोको करण्यात आला आहे. तब्बल तासभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या राज्य सरकारने साखर कारखान्याच्या माध्यमातून सक्तीने वीजपंपाची बिले वसुली करण्याच्या निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा असून, गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी,सततचे लॉकडाउन ,अतिवृष्टी, दुधाला - शेती मालाला भाव नाही अशा समस्यांनी शेतकरी हैराण झाले असताना सक्तीची वीज वसुली तात्काळ थांबवावी अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रसंगी भाऊसाहेब पवार,पिंटूनाना साळवे,शिरीष गायकवाड, कुमार डावखर,अरूण साळवे,आप्पासाहेब माळवदे,गणेश थोरात,नितिन पानसरे,बापुसाहेब पटारे,प्रशांत पवार,नवनाथ देवरे,संदिप लोहकणे,आप्पासाहेब माळवदे आदिंसह विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.