Home > News Update > राम मंदीर भूमीपुजन: नियतीने उगवलेला सूड

राम मंदीर भूमीपुजन: नियतीने उगवलेला सूड

राम मंदीर भूमीपुजन: नियतीने उगवलेला सूड
X

5 ऑगस्टला राम मंदीर भूमिपुजनाचा मोठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मात्र, ज्यांनी राम मंदीर व्हावं यासाठी लढा दिला. गेल्या दशकात हा मुद्दा तेवत ठेवून भारतीय जनता पक्षाला उभारी दिली. ते लालकृष्ण अडवाणी या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. फक्त अडवाणीच नाही तर या आंदोलनात हिरारीने भाग घेणारे अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. हा एक प्रकारे या नेत्यांविरोधात नियतीने उगवलेला सूड आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

राम मंदीर आंदोलनामुळं गेली दोन दशक देशाचं धार्मिक वातावरण दुषीत झालं. अनेकांचे जीव गेले. त्यामुळं राम मंदीराचं भूमिपुजन होत असताना या सर्व बाबी लक्षात येणं साहजिकच आहे. मात्र, त्या ही पलिकडे राम मंदीर आंदोलनासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केलं. त्यांना या सोहळ्याला येता न येणं, किंवा त्यांना सोहळ्याचं आमंत्रण नसणं हा नियतीनं उगवलेला सुड आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राम मंदीराचा पाया रचत आहेत. त्या राम मंदीराचे खरे दगड तर लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह यांनीच रचले होते. मात्र, या सोहळ्यात हे नेते कुठं आहेत?

लालकृष्ण आडवाणी: 1990 मध्ये सोमनाथ ते अयोध्या अशी रथ यात्रा काढणारे यासाठी तुरुंगवास भोगणारे लालकृष्ण अडवाणी या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. मुरली मनोहर जोशी: अयोध्या आंदोलनात महत्वाची भूमिका निभावणारे एक नेते आहेत. ते सध्या अयोध्येपासून कोसो दूर बाबरी केस प्रकरणात स्वत:ला वाचवण्यासाठी पुरावे गोळा करत आहेत.

उमा भारती: कोरोनाच्या कारणामुळे या सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाही.

कल्याण सिंह: हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर ज्या दंगली झाल्या त्या दंगलीमध्ये त्यांची भूमिका संशयास्पद होती. त्यांना देखील कोरोनाचं कारण देत सोहळ्याचं आमंत्रण दिलेलं नाही. प्रविण तोगडिया: विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राम मंदिर व्हावं यासाठी सतत प्रयत्नशिल राहिले. माध्यमांवर राम मंदीरा संदर्भात भाष्य करणाऱ्या नेत्यांपैकी ते एक महत्त्वाचे नेते राहिले आहेत.

उद्धव ठाकरे: दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची देखील राम मंदीर व्हावं यासाठी महत्त्वाची भूमिका होती. बाबरी मस्जिद पडल्यानंतर त्यांनी केलेलं विधान आणि त्यानंतर त्यांनी राम मंदीर व्हावं यासाठी घेतलेली भूमिका यामुळं राममंदीर आंदोलनाला गती मिळाली. पुढे हिच भूमिका त्यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी देखील कायम ठेवली. मात्र, त्यांना देखील या सोहळ्याचं आमंत्रण नाही.

वरील दिग्गज नेत्यांची नावं आणि त्यांनी राम मंदीर व्हावं यासाठी घेतलेली भूमिका पाहता ते या सोहळ्याला असणं गरजेचं होतं. मात्र, नियतीने या सोहळ्याला त्यांना उपस्थित राहता आलं नाही. याला नक्की काय म्हणावे? नियतीने उगवलेला सूड की अजुन काही....

Updated : 4 Aug 2020 5:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top