थंडीचा जोर कायम असतानाच उत्तर भारतात पावसाचं संकट
X
पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही भाग वगळता किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. पुढील दोन-तीन दिवसात महाराष्ट्रासह वायव्य आणि मध्य भारतामध्ये किमान तापमानामध्ये काही अंशी वाढ होण्याची शक्यता असल्याने शीतलहरींच्या स्थितीत घट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे. पण, पुढील चोवीस तासांमध्ये पूर्व भारतात किमान तापमानामध्ये लक्षणीय बदल होणार नाही.
दरम्यान पूर्व भारतासह बहुतांशी भागातील किमान तापमानामध्ये 2 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय 26 ते 29 डिसेंबर दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात हवामान खात्याने संबंधित राज्यातील अनेक भागात येलो अलर्ट जारी केला आहे. तिकडे उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला असतानाच पावसाचं नवं संकट उभं ठाकलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
याचबरोबर 27 ते 29 डिसेंबर दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंड राज्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. विदर्भातील नागपूर, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत आलेली थंडीची लाट आज ओसरली असून याठिकाणी किमान तापमानामाध्ये किंचितशी वाढ झाली आहे. असं असलं तरी गेल्या चोवीस तासात नागपुरात थंडीने पाच जणांचा बळी घेतला आहे. संबंधित सर्वजण उघड्यावर वास्तव्य करणारे होते, त्यांचा कडाक्याच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाल्याचा संशय आहे.






