मुसळधार पावसाच्या शक्यतेने पुणे आणि ठाण्यातील शाळांना सुट्टी, मुंबईत परीक्षा रद्द
X
राज्यात गेल्या काही दिवसात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्यात येत्या दोन दिवसात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर ठाण्यातील शाळांना देखील गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने गुरुवार दि.१४ जुलै २०२२ रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.
उद्या मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा तसेच इतरही विद्याशाखेच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली आहे.
हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळांवर जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. पर्यटन स्थळांच्या एक किलोमीटर परिसरापर्यंत 14 ते 17 जुलै प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसंच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.
दरम्यान अतिवृष्टीच्या शक्यतेने पुणे जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा 14 ते 16 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयामधून इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर आणि पुरंदर तालुक्यातील शाळा वगळण्यात आले आहेत.






