Home > News Update > राहुल गांधींचे संघासह केंद्र सरकारवर टीकास्त्र...

राहुल गांधींचे संघासह केंद्र सरकारवर टीकास्त्र...

सध्या राहुल गांधी लंडनमध्ये आहेत. लंडनमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. तसेच भारत-चीन संबंधांबाबतही राहुल गांधी यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यासोबतच गांधी यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपावरसुद्धा भाष्य केले आहे.

राहुल गांधींचे संघासह केंद्र सरकारवर टीकास्त्र...
X

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi) सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी लंडनमधील चॅटम हाऊसमध्ये भारतातील अनेक मुद्यावर आपले मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे लंडनमधील हाऊस ऑफ पार्लियामेंट परिसरात ब्रिटिश खासदारांना सुद्धा संबोधित केले. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) हल्लाबोल केला. त्याचप्रमाणे भारत-चीन संबंधांबाबतही महत्त्वपूर्ण विधान केले. त्याचसोबत गांधी यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपावरही भाष्य केले. भारतातील सत्ताधारी भाजप देशात द्वेष आणि हिंसेच्या विचारसरणीचा प्रसार करत असल्याचा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यावेळी केला.

राहुल गांधी यांनी थिंक टँक चॅटम हाऊसमध्ये आपले मत मांडताना संघावर हल्लाबोल केला. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मुस्लिम ब्रदरहुडप्रमाणे भारतात काम करत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे संघ ही एक कट्टरवादी आणि फॅसिस्ट संघटना असल्याचे गांधी यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतातील बहुतेक सर्वच संस्थांवर कब्जा केल्याचे राहुल गांधी म्हणाले. संघामुळे भारतातील लोकशाहीशी असलेली स्पर्धा (डेमोक्रॅटिक कॉम्पिटिशन) पद्धत पूर्णपणे बदलली असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. भारतातील प्रेस, न्यायव्यवस्था, संसद आणि निवडणूक आयोग केंद्रातील भाजप ( BJP ) सरकारमुळे धोक्यात आली असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच या सर्व संस्थावर केंद्रातील सत्ताधारी कुठल्या ना कुठल्या मार्गाने अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

राहुल गांधी यांनी भारत आणि चीन यांच्यामध्ये सुरु असलेल्या तणावाबाबत मोठे विधान केले. या तणावाचा गांधी यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाशी संबंध जोडला. ते हाऊसस ऑफ पार्लियामेंट परिसरामध्ये खासदारांना संबोधित करत होते. भारत आणि चीनच्या सीमेवर ( INDIA CHINA FACEOFF ) जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ती देशासाठी घात असल्याचे गांधी यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी याबाबत एस. जयशंकर यांच्याशी संवाद साधल्याचे सांगितले. आणि जयशंकर यांनी माझ्या मताशी असहमती दर्शवल्याचे सांगितले. तसेच ही बाब हास्यास्पद असल्याचे सुद्धा जयशंकर यावेळी मला म्हणाल्याचे राहुल गांधी म्हणाले.

भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध कायम चांगले राहु नये असे चीनला दरवेळी वाटत असते. त्यामुळे चीनने भारताच्या सीमेवर मोठ्याप्रमाणात आपले सैनिक तैनात केले आहेत. आणि चीन भारताला सातत्याने धमकी देत आहे आणि केंद्र सरकार याकडे कानाडोळा करत असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. अमेरिकेशी संबंध कायम ठेवले तर आम्ही कारवाई करु, अशी धमकी चीन सातत्याने देत असते. त्यानुसार चीनने अरुणाचल प्रदेश आणि लडाखच्या सीमेवर आपलं सैन्य तैनात केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यामुळे याचा भारताला धोका कायम आहे. आणि भारतात कधीही रशिया-युक्रेनसारखी परिस्थिती निर्माण होवू शकते, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. याअगोदर राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठामध्ये भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचसोबत त्यांनी आपली आणि देशातील इतर नेत्यांवर लक्ष ठेवले जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भारताच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरवात झाली होती. मात्र त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापही करण्यात आलेली नाही.

Updated : 7 March 2023 7:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top