कॉम्रेड सुबोध मोरे साहबको गुस्सा क्यों आया? - प्रा.हरी नरके
Max Maharashtra | 7 Aug 2019 12:15 PM GMT
X
X
माझे परममित्र श्रीयुत सुबोध मोरे साहेब यांनी माझ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावरील फेसबुक पोस्टचे खंडन करणारा प्रदीर्घ लेख लिहीलेला आहे. त्यात त्यांनी माझ्यावर भरमसाठ आरोप केलेले आहेत. व्यक्तीगत पातळीवरची टीका केलेली आहे. मलाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देता येईल. मात्र, मी तसे करणार नाही. श्री मोरे हे कम्युनिष्ट चळवळीतले पिढीजात कार्यकर्ते आहेत. त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर, ज्योती बसू, मोहित सेन, सोमनाथ चटर्जी, गोविंद पानसरे, बाबूराव बागूल, भालचंद्र कांगो, अजित अभ्यंकर आदी त्यागी, तपस्वी, आणि व्रतस्थ अशा राष्ट्रनिष्ठ डाव्यांचा अपवाद वगळता बहुतेक डावे म्हणजे निव्वळ अहंकारी, माणूसघाणे, पोथीनिष्ठ आणि दिखाऊ होत. उजव्यांना मनूची तर अशा डाव्यांना दाखवायला मार्क्सची नी आतून मनूची पोथी हवी असते. पोथी महत्वाची.
चर्चा, वादविवाद, वादग्रस्त मुद्दे असे काही असू शकते यावर सुबोध मोरे यांच्यासारख्या डाव्या भक्तांचा विश्वास नसतो. त्यांच्या दृष्टीने सत्य हे एकांगीच असते. ते सांगतील तेवढेच सत्य आणि सत्याचा कॉपीराईट फक्त कम्युनिष्टांकडे असतो. कॉम्रेड मोरेसाहेब, कोणत्याही गोष्टीला किमान दोन किंवा त्याहून जास्त बाजू असू शकतात यावर तुमचा नसला तरी माझा विश्वास आहे.
अण्णा भाऊंचा जेवढा सन्मान व्हायला हवा होता, तेवढा तो झाला नाही ही माझी खंत आहे. ती आजवर अनेक मान्यवरांनी मांडलेली आहे. अगदी कम्युनिष्ट हायकमांड असलेल्या श्रीपाद अमृत डांग्यानीही. तेव्हा त्यात अण्णा भाऊंचा अपमान आम्ही करतोय, बदनामी करतोय असे म्हणणा-याला तुम्ही आत्मपरीक्षण करावे ही नम्र विनंती.
१. दुस-यांच्या प्रसिद्धी, लोकप्रियता आणि विश्वसनियतेवर आयुष्यभर जळणारे तुमच्यासारखे कॉम्रेड देशातून का हद्दपार झाले? याचे एकदा आत्मपरीक्षण करा. रशियात किंवा चीनमध्ये पाऊस पडला की मुंबईत छत्री उघडून चालणारे तुम्ही झापडं लावलेले डावे भक्त प्रश्न विचारणा-यांना डाव्या चळवळीचे थेट शत्रू ठरवून मोकळे होता. तुम्ही काहीही ठरवा, आम्ही प्रश्न विचारणारच. त्याची उत्तरं देता येत नाहीत. म्हणून बुद्धीभेद करणारे तुमच्यासारखे डावे आणि उजवे हे एकाच माळेचे मणी आहेत.
२. मोरेसाहेब, अण्णा भाऊ साठे यांची उपेक्षा झाली असे मी म्हटले तर मी अण्णा भाऊंची बदनामी करतोय असा तुमचा आरोप आहे. कमाल तर ही आहे की, तुम्हीही कम्युनिस्ट सोडून उरलेल्यांनी अण्णा भाऊंची उपेक्षा केली असेच म्हणताय. याचा अर्थ तुम्हाला अण्णा भाऊंमध्ये रस नाही. तुम्हाला फक्त कम्युनिष्टांची थोरवी गाण्यात रस आहे.
३. आधल्या दिवशी टॅक्सीत बेशुद्ध अवस्थेत तुम्ही त्यांना पाहिलेत व टॅक्सीवाल्याच्या मदतीने त्यांना तुम्हीच घरी सोडले नी दुस-या दिवशी सकाळी ते वारले असे मोरेसाहेब तुम्ही सांगता. बेशुद्ध माणसाला दवाखान्यात नेण्याऎवजी तुम्ही घरी सोडून पळून गेलात? एवढ्या लहान वयात तुम्ही किती क्रियाशील होतात ना? अण्णा भाऊंना ४९ व्या वर्षी आजारपणात मृत्य़ू आला. त्यांना जर चांगल्या दवाखान्यात उपचार मिळाले असते तर ते वाचले असते. कम्युनिष्ट पक्षाने त्यांना उपचारांसाठी, औषध पाण्यासाठी पैसे का दिले नाहीत? त्यांना उपचारासाठी रशियाला का पाठवले नाही?
४. कॉम्रेड सुबोध, अण्णा भाऊ लिव्हर खराब झाल्याने वारले असा दावा तुम्ही करताय म्हणजे अण्णा भाऊ दारूडे होते असे सांगून तुम्हीच त्यांची बदनामी करताय.
५. ज्या अण्णा भाऊंना सरकारच्या वृद्ध कलावंत सहाय्यता निधीवर जगावे लागत होते, जे घेऊन ते आधल्याच दिवशी आले होते असे तुम्हीच सांगताय, ज्यांना सरकारी कोट्यातून घर मिळेपर्यंत झोपडपड्डीत राहावे लागत होते, ज्यांच्या पत्नीला व मुलीला मजूरी करावी लागत होती, ज्यांच्या कार्यक्रमाला लाखो लोक जमत असत त्यांच्या अंत्ययात्रेला अवघे २५० ते ३०० लोक होते. असे तुम्हीच सांगताय आणि तरी त्यांचा महान सन्मान डाव्यांनी केल्याचा दावाही करताय, हा साराच प्रकार निव्वळ संतापजनक आहे.
अहो, एखाद्या सामान्य माणसाच्याही मैतीला एक - दोन हजार लोक सहज जमतात, तिथे अण्णा भाऊंसारख्या जगप्रसिद्ध कलावंत, लोकशाहीर, साहित्यरत्न असलेल्या महान लेखकाच्या अंत्ययात्रेला लाखो लोक का नव्हते? हा प्रश्न तुम्हाला पडत नाही. लोक त्यांना प्रेमाने खाऊ घालत होते अशी तुम्ही बढाई मारताय, अण्णा भाऊंसारख्या बुद्धीवंताला लोकांच्या घरी जेवावे लागणे. यात त्यांचा आत्मसन्मान दुखावला जातोय हे तुमच्या लक्षात कसे येत नाही?
६. अंत्ययात्रेला हजर असलेल्या ज्या पंचवीस लोकांची तुम्ही नावे दिलीत त्यातल्याच तिघांनी मला सांगितले की, खूप कमी लोक अंत्ययात्रेला होते. परवा पुण्यात बाल गंधर्व नाटयमंदिरात बोलताना प्रसिद्ध विचारवंत आणि अण्णा भाऊ साठे निवडक वाड्मयाचे संपादक अर्जून डांगळे जाहीरपणे म्हणाले, "अण्णा भाऊंच्या अंत्ययात्रेला मी हजर होतो. त्याठिकाणी ५० ते ६० लोक होते." या भाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डींग माझ्याकडे आहे. तुम्ही तोच आकडा पाचपट वाढवून २५० ते ३०० करताय. त्यावेळी तुमचे वय साडेदहा वर्षाचे होते आणि तरिही तुम्ही अर्जून डांगळे यांच्यासह अन्य उपस्थित मान्यवरांना खोटे ठरवताय.
७. "कम्युनिस्ट पक्षाने, ज्येष्ठ नेते कॉम्रेड डांगे यांनी अण्णा भाऊंच्या 'शाहीर' पुस्तकाला प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला" असे तुम्ही म्हणता. ती प्रस्तावना अण्णा भाऊ साठे निवडक वाड्मयात छापलेली आहे. [पृ.११३९ ते ११४६] त्यात कॉम्रेड डांगे यांनी अण्णा भाऊंचा किती हात राखून गौरव केलाय ते दिसतेच आहे. अण्णा भाऊंच्या लेखनावर खरंतर डांग्यांनी प्रस्तावनेत काही ठिकाणी टिकाच केलीय. ते म्हणतात, "अण्णा भाऊंचे लेखन प्रचारकी आहे." "अण्णा भाऊंच्या काव्यात न्यूनता दिसते." "अण्णा भाऊंना इतिहासाची माहिती असल्याचे दिसत नाही." हा गौरव आहे?
८. अण्णा भाऊंना डाव्यांनी याव केले नी त्याव केले याची भली मोठी यादी कॉम्रेड मोरे देतात. डाव्यांनी त्यांच्यावर उपकार केलेत की काय कॉम्रेडसाहेब ? एव्हढ्या मोठ्या प्रतिभावंताची कदर करण्याची दानत डाव्या आणि उजव्यात, बुद्धीवंतात, बहुजनात कोणातच नव्हती हे माझे दु:ख आहे. अण्णा भाऊ गेले तेव्हा मी इयत्ता पहिेलीच्या वर्गात शिकत होतो.
९. त्यांच्या कथेवर चित्रपट झाला आणि तो बघायला मात्र आपल्या बायकोला अण्णा भाऊंना स्वत: तिकीट काढून पाठवावे लागले असे मोरे लिहितात. खुद्द लेखकाला थिएटरचा पास मिळाला नाही, तिकीट काढावे लागले हा त्यांचा गौरव आहे?
१०. अण्णा भाऊ साठे यांचे नाव कॉम्रेड मोरे अनेकदा "अण्णाभाऊ" साठे असे एकत्र लिहितात. त्यांचे नाव तुकाराम उर्फ अण्णा असे होते. भाऊ हे त्यांच्या वडीलांचे नाव होते. तेव्हा ज्यांना अण्णा भाऊंचे नावही धड नीट लिहिता येत नाही असे कॉम्रेड सुबोध मोरे त्यांच्या कितीतरी जवळचे असणार यात काय शंका?
मुद्दे तर अनेक आहेत. तुर्तास एव्हढेच.
Updated : 7 Aug 2019 12:15 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire