Home > News Update > जातपंचायतीला दणका, बहिष्कारप्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा

जातपंचायतीला दणका, बहिष्कारप्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा

जातपंचायतीला दणका, बहिष्कारप्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा
X

पत्नीपासून अलिप्त होण्यासाठी घटस्फोटाचा दावा जातपंचायतीऐवजी न्यायालयात दाखल केल्याने जातपंचायतीने मुलाच्या कुटुंबियांना वाळीत टाकल्याची प्रकार सांस्कृतिक नगरी पुण्यात घडला होता. युवकासह त्याच्या कुटुंबियांना पावणे तीन वर्षांपासून जातपंचायतीच्या हुकुमावरून समाजातून बहिष्कृत केले आहे. त्यामुळे जातपंचांयतीचे पाटील, पंच यांच्यासह 14 जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या कलम 5 व 6 नुसार आणि भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 120-बी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. जातपंचायतीचे पाटील आणि पंच म्हणून मुलीचे आजोबा, मामा हे काम पाहत होते, त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आकुर्डी पुणे शाखेने यासाठी पाठपुरावा केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. सागरे कुटुंबियांच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने पोलिसांकडे केली होती.

प्रकरण नेमके काय?

सीताराम सागरे यांचा 01 जानेवारी 2013 रोजी शीतल भोरे यांच्याशी विवाह झाला. मार्च 2018 मध्ये नवरा बायकोमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. शीतलचे कुटुंबीय आणि नातेवाईक हे पत्नी शीतल हिला माहेरी घेऊन गेले. सागरे यांनी पत्नी शीतल भोरे यांच्यापासून अलिप्त होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात डिसेंबर 2018 मध्ये दावा दाखल केला आहे. पण जातपंचायतीऐवजी न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केल्याने सागरे कुटुंबियांना पावणे तीन वर्षांपासून जातपंचायतीच्या हुकुमावरून समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. जातीचे ठराविक लोक पंच म्हणून काम करत असून त्यातील मुख्य पंचाला पाटील म्हणण्याची प्रथा आहे. विशेषतः पत्नी शीतल यांचे आईचे वडील अर्थात आजोबा करेप्पा मारुती वाघमारे आणि मामा बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे, बाळकृष्ण करेप्पा वाघमारे हे जातपंचायतीचे पाटील म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पुढाकारानेचे सागरे कुटुंबियांना समाजातून बहिष्कृत करून अमानवीय वागणूक देण्यात आल्याचा आरोप आहे. सागरे कुटुंबियांशी कुणी संबंध ठेवू नये, ठेवल्यास त्यांनाही वाळीत टाकू असे फर्मान जातपंचायतीने काढले. सागरे कुटुंबियांना समाजातील, नात्यातील सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी करून घेतले जात नसून त्यांच्याही कार्यक्रमांना कुणाला येऊ दिले जात नाही. वाळीत टाकण्याबाबत सागरे कुटुंबीयांनी जातपंचायतीचे पाटील आणि पंचांना विचारणा केली असता वाळीत टाकण्याचे कृत्य योग्यच असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र अंनिसच्या लढ्यामुळे बहुतांश जातींमध्ये जातपंचायतचे अस्तित्व असल्याचे निदर्शनास आले. 4 वर्षात या कायद्यांर्गत 150 गुन्हे राज्यात दाखल झाले आहेत. राज्यात कोकण वगळता जिल्ह्यात सर्वाधिक 15 गुन्हे या कायद्यांतर्गत दाखल झाले आहेत. सागरे कुटुंबियांसंदर्भातील 16 वा गुन्हा दाखल झाला आहे. अंनिसच्या संवादी भूमिकेमुळे आणि पुढाकाराने राज्यातील 17 जातपंचायती बरखास्त झाल्या आहेत.

जातपंचायतीचे पाटील आणि पंचांसह 14 जणांविरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या जातपंचायतीमुळे अन्य कुणी पीडित झाले असेल त्यांनाही तक्रार दाखल करण्यासाठी आवाहन करावे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्यावतीने करण्यात आले आहे.

Updated : 2 Sep 2021 12:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top