capitol hill protest: मोदींना अमेरिकेतील हिंसाचाराची चिंता...
X
अमेरिकेच्या संसद इमारतीत मोठा हिंसाचार झाला आहे. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या अमेरिकेत सत्ता हस्तातरणाचा काळ सुरू आहे. मात्र, अमेरिकेचे मावळते अध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प हे अद्यापपर्यंत पराभव स्विकारत नसल्याचं चित्र कायम असताना ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून गोंधळ घातला आहे. या गोंधळामुळे संसदेचं कामकाज थांबवावं लागलं आहे.
यावर जगभरातील नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बलाढ्य लोकशाही देश अशी अमेरिकेची ओळख आहे. मात्र, या देशातील सत्तेच्या हस्तातरणांमध्ये जो हिंसाचार होत आहे. तो जगभरासाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणूकीत ट्रम्प यांचा पराभव झाला होता. या निकालानंतर आज संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जो बायडन यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार होती. मात्र, ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये येऊन गोंधळ घातल्यानं ही घोषणा करता आली नाही. त्यातच या गोंधळाने संसदेचं कामकाज तहकूब करावं लागलं.
यावेळी ट्रम्प समर्थकांनी पोलिसांशी देखील झटापट केली. यामध्ये एका व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. साधारण 4 ते 5 तास हा गोंधळ सुरू होता. पोलिसांनी आता या सर्व गोंधळावर नियंत्रण मिळवलं असून परिस्थिती नियंत्रणात आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. "वॉशिंग्टन मध्ये झालेल्या दंगलीच्या बातम्याने चिंता वाटली. सत्ता परिवर्तन शांतमय पद्धतीने व्हायला पाहिजे. बेकायदेशीर आंदोलनाच्या जोरावर लोकशाहीच्या प्रक्रियांना उद्वस्थ केलं जाऊ शकत नाही' असं मोदी यांनी म्हटलं आहे.
या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटर आणि फेसबूक ने देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. कॅपिटॉल इमारतीत गोंधळ सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीबाबत निराधार आरोप करत होते. त्यानंतर ट्विटर आणि फेसबूक ने ट्रम्प यांचं ट्विटर अकांउट 12 तासासाठी आणि फेसबूक 24 तासासाठी ब्लॉक केलं आहे. तसंच नागरी अखंडत्त्वाबाबतचे तीन ट्विट डीलिट न केल्यास त्यांचं ट्विटर अकाउंट कायमचं बंद करण्यात येईल. असा इशारा ट्विटर ने दिला आहे.
दरम्यान या संदर्भात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी ट्विट केलं असून... "कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न मानणाऱ्यांची ही छोटी संख्या आहे…हा देशद्रोहाचा मार्ग आहे आणि तो थांबला पाहिजे" अशा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.






