पवई तलावाचे महापालिकेकडून होणार सुशोभीकरण; शंभर कोटी रूपयांचा येणार खर्च
पवई तलावाचे महापालिकेकडून होणार सुशोभीकरण करण्यात येणार आहेत यासाठी तब्बल शंभर कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.
X
मुंबई : मुंबई उपनगरातील नागरिकांना विरंगुळा ठिकाण असलेल्या पवई तलावाची आता पालिका मोठ्या प्रमाणत स्वच्छता आणि सुशोभीकरण करणार आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या मागणीवरून तलाव सुशोभीकरण करण्याचा नियोजन आराखडा बनविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी आज या तलावाची पाहणी केली. या ठिकाणी गणेश मुर्ती विसर्जन, दुर्गा माता मुर्ती विसर्जन, छटपूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. पवई तलाव हा एक निसर्गरम्य परिसर असुन, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यामुळे तलावाचे सुभोभिकरण करून निसर्गाचा अमूल्य ठेवा जपणे आवश्यक आहे.या उद्देशाने लवकरच तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
तलावाशेजारी जॉगिंग ट्रॅक , बगीचा, जेष्ठ नागरीकांना बसण्यासाठी बेंच अशा विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देखील तयार करण्यात येणार आहेत. तसेच तलावातील गाळ, वनस्पतीची साफसफाई करण्यात येणार आहे. तलावात सुंदर व संगीताच्या तालावरील भव्य विद्युत रोषणाईयुक्त सात कारंजे बनविण्यात येणार आहेत. यासाठी पालिका तब्बल शंभर कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे.
तसेच विहार तलावचे होणारे ओव्हर फ्लो पाणी भांडुप पंपिंग स्टेशनकडे वळविण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली. तर नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटीप्रमाणे इथे सुशोभीकरण होईल तसेच पर्यावरणच्या नियमाचे काटेकोर पालन करून इथला गाळ काढला जाणार असल्याचे आमदार लांडे यांनी सांगितले.