Home > News Update > कोविड: राज्यात लाखाच्या वर गुन्हे दाखल

कोविड: राज्यात लाखाच्या वर गुन्हे दाखल

कोविड: राज्यात लाखाच्या वर गुन्हे दाखल
X

मुंबई दि.२६ - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १लाख ३६ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ५ लाख ९० हजार व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २५ जून या कालावधीत कलम १८८ नुसार १,३६,०६८ गुन्हे नोंद झाले असून २७,७१७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ०९ लाख ५४ हजार ०७८ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख १५ हजार ७१० पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २८३ घटना घडल्या. त्यात ८५८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर- १ लाख ४ हजार फोन

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,०४,६९५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७४६ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,९०,३८० व्यक्ती Quarantine आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८४,८२१ वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३६पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३७, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे २ पोलीस व ठाणे ग्रामीण १अधिकारी २, जळगाव ग्रामीण १, पालघर १, जालना पोलीस अधिकारी १, उस्मानाबाद १ अशा ५७ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १०७ पोलीस अधिकारी व ९०८ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रिलिफ कँम्प

राज्यात सध्या एकूण ९३ रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३,१४६ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोशल डिस्टेन्सिंग पाळा

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे

Updated : 27 Jun 2020 3:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top