Home > News Update > सरकार घटनाबाह्य असल्याचे सांगत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

सरकार घटनाबाह्य असल्याचे सांगत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

सर्वोच्च न्यायालयाने ज्या एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून नाकारले, तेच एकनाथ शिंदे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कलंकित तसेच शेतकरी विरोधी आहे. अशा कलंकित सरकार सोबत चहापाणी न करण्याची आमची भूमिका आहे, असं सांगत विरोधी पक्षनेते अंबादास गांधी यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला.

सरकार घटनाबाह्य असल्याचे सांगत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
X

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या 17 जुलै पासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर चौफेर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिलेल्या सरकारच्या चहापानी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते एकनाथ खडसे, आमदार सुनील प्रभू, भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ज्या एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून नाकारले, तेच एकनाथ शिंदे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कलंकित तसेच शेतकरी विरोधी आहे. अशा कलंकित सरकार सोबत चहापाणी न करण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकारच्या चहापाण्यावर बहिष्कार घालत आहोत.

पुढे ते म्हणाले, सरकारने मागील वर्षी कांदा उत्पादकांना 31 मार्च पर्यंत 300 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप हे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे सरकार अद्याप 50 हजार प्रोत्साहन अनुदान देऊ शकलेले नाही. कापसाचे दर 12 हजार रुपयाहून 6 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे परंतु या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.

राज्यात गेल्या एका वर्षात तब्ब्ल बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या या आत्महत्या रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारमधील मंत्री अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोट्या कारवायांच्या माध्यमातून वसुली करत आहेत. आर्थिक गैर व्यवहारामुळेच महसूल मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या विविध अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मॅट कोर्टाने स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले. सत्तारांच्या कृषी खात्यात खोट्या कारवाईच्या माध्यमातून वसुली केली जात होती. संजय राठोड यांनी माझ्या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचे मान्य केले होते यावरून हे सरकार भ्रष्टाचारी असल्याची टीका दानवे यांनी केली.

राज्यात गेल्या वर्षभरात चार हजाराहून अधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुंबईत शासकीय वसतिगृहातील मुलीवर सुरक्षा रक्षकानेच अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना, पुणे येथील मुलीवर करण्यात आलेला चाकू हल्ला, एमपीएसी उत्तीर्ण मुलीचा राजगडाच्या पायथ्याशी करण्यात आलेला खून या सारख्या घटनामुळे महिला व मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्यात कायदा सुव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे.या सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासहित आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, सर्वोच्च न्यायालयाने देखील या घटना बाह्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

राज्यात 6000 मुली बेपत्ता असून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे,

काँग्रेसचे विधानसभेतील 45 सदस्य आहेत त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदावर दावा करण्यात येईल असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले.

राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

झाल्या असून बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे.राज्यात शेतीची अवस्था बिकट आहे.दुबार पेरणी देखील आता शक्य नाही.दुष्काळाचा परिणाम शहरी भागात महागाई वाढली आहे, असे राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

राज्यात ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणाचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. या तपास यंत्रणाचा वापर करून विरोधी पक्षांना संपविण्याचे काम सुरु आहे.

समृद्धी महामार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे परंतु या सरकारकडून हे अपघातात रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी आहे की लोकांचा जीव घेण्यासाठी? असा सवाल यावेळी दानवे यांनी केला.


Updated : 16 July 2023 11:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top