Home > News Update > Nasik Bus Accident : नाशिक बस दुर्घटना, चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या चौकशीचे आदेश

Nasik Bus Accident : नाशिक बस दुर्घटना, चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या चौकशीचे आदेश

नाशिक येथे झालेल्या दुर्घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यातच या आगीत अकरा जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Nasik Bus Accident : नाशिक बस दुर्घटना, चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या चौकशीचे आदेश
X

नाशिक- औरंगाबाद महामार्गावर यवतमाळहुन मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी बसला आग लागली. या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

संजय राठोड यांनी नाशिक येथे खासगी बसला लागलेल्या आगीवर प्रतिक्रीया देतांना म्हटले की, नाशिक येथे झालेल्या अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स मध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच हा अपघात झाल्यानंतर संजय राठोड यांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयास भेट दिली. नाशिक जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. शिवाय ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाश्यांबाबत माहिती घेतली. आग लागण्यामागे कारण काय, ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती काय? याबाबत माहिती घेऊन मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केली मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाशिक दुर्घटनेतील नागरिकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून या दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींना पीएम केअर्स फंडाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जाहीर केली मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून म्हटले की, नाशिक येथे झालेल्या भीषण बस अपघातात ११ नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असून या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जाईल. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

छगन भुजबळ यांनीही व्यक्त केल्या संवेदना

छगन भुजबळ यांनी घेतली दुर्घटनाग्रस्तांची भेट घेत अपघातग्रस्तांची विचारपूस केली. तसेच या अपघातामध्ये 11 जणांचा झालेला मृत्यू दुर्दैवी असल्याचेही छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री काही वेळात नाशिकला पोहचणार असल्याचे म्हटले आहे. तसेच ज्या ठिकाणी अपघात झाला. त्या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतील तर त्यासाठी उपाययोजना कराव्यात, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

शरद पवार यांनी व्यक्त केल्या संवेदना

नाशिक येथे झालेल्या अपघातावर प्रतिक्रीया देतांना शरद पवार म्हणाले की, सरकारने मदत जाहीर केली आहे. त्याबरोबरच बसमध्ये आग का लागली? यामध्ये काही कमतरता होती का? याबाबत सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही आग का लागली हे चौकशीनंतरच समजणार असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच शरद पवार यांनी मृतांच्या कुटूंबियांप्रति संवेदना व्यक्त केली.


Updated : 8 Oct 2022 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top