Home > News Update > नाना पटोले तुमच्या डोक्याचा लोच्या झाला आहे, प्रकाश आंबेडकरांनी सुनावले खडे बोल

नाना पटोले तुमच्या डोक्याचा लोच्या झाला आहे, प्रकाश आंबेडकरांनी सुनावले खडे बोल

नाना पटोले तुमच्या डोक्याचा लोच्या झाला आहे, प्रकाश आंबेडकरांनी सुनावले खडे बोल
X

महाविकास आघाडीच्या(MVA)नेत्यांची आज मुंबईत बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. या बैठीत वंचित बहुजन आघाडीचे (VBA)नेते अॅड. प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांना आमंञित करण्यात आल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण अशा बैठकीचे आमंत्रण आले नसल्याचा खुलासा वंचितने पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

या पत्रावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हटलंय या पत्रात

श्री. नाना पटोले,

असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री. रमेश चेन्नीथाला यांनी मंगळवार २३ जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात.

तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की काँग्रेस हाय कमांड ने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत. शिवसेनेसोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा INDIA आघाडीच्या युतिसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाहीत.

AICC किंवा काँग्रेस हाय कमांड ने महाराष्ट्रात युतिसंदर्भात निर्णय घेण्याची परवानगी तुम्हाला दिली आहे का?

काल औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की वंचित बहुजन आघडीला महाविकास आघाडीकडून निमंत्रण द्यायचे असेल तर त्यावर तिन्ही घटक पक्षांच्या अध्यक्ष, म्हणजेच श्री. उद्धव ठाकरे, श्री. शरद पवार व श्री. मल्लिकार्जुन खरगे, यांची सही असायला हवी.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) व काँग्रेस यांच्या अध्यक्षांच्या सहिनिशी सन्मानपूर्वक निमंत्रण द्या. किंवा श्री. रमेश चेन्नीथाला, श्री. राहुल गांधी, श्रीमती सोनिया गांधी अथवा श्री. मल्लिकार्जुन खरगे यापैकी कोणी वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलावल्यास कोणताही संकोच न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ.

वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीमध्ये सहभागावरून वेळोवेळी मतभेद झाल्याचे दिसत आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या या पत्राला नाना पटोले काय उत्तर देतात याची प्रतिक्षा करावी लागेल…

Updated : 25 Jan 2024 1:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top