Home > News Update > माझ्या वाक्याचा विपर्यास केला : मंत्री यशोमती ठाकुरांचे वादावर स्पष्टीकरण

माझ्या वाक्याचा विपर्यास केला : मंत्री यशोमती ठाकुरांचे वादावर स्पष्टीकरण

माझ्या वाक्याचा विपर्यास केला : मंत्री यशोमती ठाकुरांचे वादावर स्पष्टीकरण
X

यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये टोलेबाजी सुरु झाल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यावरुन झालेल्या वादावर स्पष्टीकरण देत `माझ्या वाक्याचा विपर्यास` केल्याचं म्हटलं आहे.

त्या म्हणाल्या, मला असं वाटतं की, माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांचा प्रदीर्घ अनुभव, त्यांचा राजकीय वकुब यांची महाराष्ट्राला नितांत आणि नेहमीच आवश्यकता राहिलेली आहे. महाराष्ट्र राज्याला आणि आम्हाला मार्गदर्शक म्हणून ते हवेच आहेत.

किंबहुना सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची देखील हीच भूमिका असेल. यांचा अर्थ उद्धव ठाकरे साहेब आम्हाला नको आहेत किंवा त्यांच्यावर टीका केली असा होत नाही. ज्यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात येत होती, त्यावेळी अनेक तर्कवितर्क काढण्यात येत होते. मात्र त्यावेळेस मी हे म्हटलं होतं, या वाक्यांची मी कालच्या भाषणात आठवण करून दिली. बस्स एवढंच!

आणि तेवढाच त्याचा संदर्भ आणि अर्थ देखील आहे. या वाक्याचा वेगळा अर्थ काढून या निमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे भासवून राजकीय वाद निर्माण करण्यात विरोधकांना रस आहे. मात्र आम्ही कुणीही त्याला बळी पडणार नाही. असे छोटे मुद्दे उपस्थित करून महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी अभेद्य आहे. महत्वाचा मुद्दा असा की, आमचे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून अतिशय कार्यक्षमपणे काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. त्यांनी आतापर्यंत अतिशय उत्तम काम केले आहे आणि करीत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे ठाकुर यांनी स्पष्ट केलं.

सोबतच महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्हाला पितृतुल्य व्यक्तिमत्व असलेल्या पवार साहेबांचे गुणगान करताना बोलल्या गेलेल्या शब्दांचा कुणी गैर अर्थ काढू नये, एवढंच प्रांजळपणे सांगते, असं यशोमती ठाकुर यांनी शेवटी सांगितले.

Updated : 11 April 2022 11:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top