Home > News Update > लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणारे दोन खासदार महाराष्ट्राचे

लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणारे दोन खासदार महाराष्ट्राचे

लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणारे दोन खासदार महाराष्ट्राचे
X

निवडून दिलेले लोकप्रतिनिधी विधानसभा किंवा संसदेत गेल्यानंतर जनतेच्या प्रश्नांवर किती आवाज उठवतात, याबद्दल कायम नकारात्मक प्रतिक्रिया येत असतात. पण सध्याच्या लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडून त्यावर चर्चा घडवून आणणाऱ्या देशभरातील खासदारांमध्ये महाराष्ट्रातील दोन खासदारांनी पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या प्रथम क्रमांकावर आहेत तर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यासंदर्भात स्वत: सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. १७व्या लोकसभेच्या पहिल्या दिवसापासून ते नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेनातील कामगिरी यामध्ये नोंदवण्यात आली आहे.

"या १७ व्या लोकसभा अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर झाली.संसदेच्या रेकॉर्डस् मधील नोंदीनुसार 'पीआरएस' या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहीर केली आहे. यामध्ये अधिवेशनातील उपस्थितीसह प्रश्नोत्तरे,विविध चर्चांमधील सहभाग, खासगी विधेयके आदींचा प्रकर्षाने उल्लेख करण्यात आला आहे. ही आकडेवारी आपल्या माहितीसाठी शेअर करत आहे. आपण सर्वांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि प्रेम यामुळे हे शक्य झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता, @NCPspeaks

, सहयोगी पक्ष व कार्यकर्त्यांनी मला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.आपल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.यातूनच मला महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विविध मुद्दे संसदेत मांडण्यासाठी ऊर्जा मिळते. यापुढेही संसदेच्या माध्यमातून मतदारसंघातील व राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन याची ग्वाही देते. धन्यवाद."

अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

*खासदारांच्या चांगल्या कामाचे निकष काय?*

उत्तम काम करणाऱ्या खासदारांसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे खासदाराने किती मुद्द्यांवर चर्चा उपस्थित केली. किती खासगी विधेयकं मांडली, एकूण किती प्रश्न विचारले आणि संसदेत त्यांची उपस्थिती किती होती, या निकषांवर खासदारांची कामगिरी तपासण्यात येते.



वर उल्लेख केलेल्या निकषांनुसार सुप्रिया सुळे यांनी ११० वेळा चर्चा उपस्थित केली तर खासदार श्रीरंग बारणे यांनी ४८ वेळा चर्चा उपस्थित केली. दोन्ही खासदारांना ७-७ खासगी विधेयक मांडली. सुप्रिया सुळे यांनी ३८३ प्रश्न संसदेत विचारले आहेत, तर श्रीरंग बारणे यांनी ३८५ प्रश्न विचारले आहेत. सुप्रिया सुळे यांची ९१ टक्के उपस्थिती होती आणि श्रीरंग बारणे यांची उपस्थितीत ९६ टक्के होती. तिसऱ्या क्रमांकावर झारखंडचे खासदार बिद्युत बारन महातो आहेत.

Updated : 3 Jan 2022 9:35 AM IST
Next Story
Share it
Top