औरंगाबाद विमानतळाचे नामांतर करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
X
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा वाद सध्या तापलेला असताना आता औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय़ राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना काढावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केलेले आहे. औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.
याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आले आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
दरम्यान औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास काँग्रेने विरोध केला आहे. पण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये संभाजीनगर (औरंगाबाद) असे लिहिण्यात आले आहे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे हे ट्विट रिट्विट केले आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेस नेते संभाजीनगर नावाला विरोध करत आहेत तर दुसरीकडे संभाजीनगर नावाचा वापर सरकारी निर्णयांमध्ये केला जात आहे, असे चित्र दिसते आहे.






