Home > News Update > Lakhimpur Kheri Violence: साक्षीदारांना संरक्षण द्या, सर्वोच्च न्यायालयाचे योगी सरकारला निर्देश

Lakhimpur Kheri Violence: साक्षीदारांना संरक्षण द्या, सर्वोच्च न्यायालयाचे योगी सरकारला निर्देश

Lakhimpur Kheri Violence: साक्षीदारांना संरक्षण द्या, सर्वोच्च न्यायालयाचे योगी सरकारला निर्देश
X

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी लखीमपूर खेरी प्रकरणावर सुनावणी करताना उत्तर प्रदेश पोलिसांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या खटल्यातील साक्षीदारांना सुरक्षा पुरवावी आणि त्यांचे जबाब नोंदवावेत, असे आदेश दिले आहेत.

लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या मुलावर शेतकऱ्यांवर गाडी चालवल्याचा आरोप आहे. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या या हल्ल्यात लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये तीन भाजप कार्यकर्ते आणि एका पत्रकाराचा समावेश आहे.

सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मंगळवारीच उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी दुसरा स्टेटस रिपोर्ट दाखल केला.

न्यायालयात उत्तर प्रदेश सरकारतर्फे बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीमने शक्य तितक्या साक्षीदारांची ओळख पटवावी. याशिवाय फॉरेन्सिक तपासालाही गती द्यावी. तसंच साळवे यांनी न्यायालयाला सांगितले की, कलम १६४ अन्वये ६८ साक्षीदारांपैकी ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापैकी 23 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. साळवे म्हणाले की, यासंदर्भात जाहिरात देऊन लोकांनी पोलिसात येऊन पुरावे द्यावेत, असे म्हटले आहे. या घटनेतील सर्व 16 आरोपींचीही ओळख पटली असल्याचेही साळवे यांनी सांगितले.

यावर न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, "या प्रकरणात हजारो लोक उपस्थित होते आणि सर्व स्थानिक होते. या घटनेनंतर यातील बहुतांश लोक चौकशीची मागणी करत होते. त्यामुळे लोकांना ओळखण्यात कोणतीही अडचण येणार नाही." या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ८ नोव्हेंबरला होणार आहे.

अजय मिश्राचा राजीनामा घ्या शेतकऱ्यांची मागणी...?

शेतकरी आणि विरोधकांच्या दबावानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला पोलिसांनी अटक केली. मात्र, आशिष मिश्रा यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांना मोदी मंत्रिमंडळातून काढावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.. या प्रकरणी गेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले होते.

काय आहे प्रकरण?

रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे.

Updated : 26 Oct 2021 12:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top