Home > News Update > भाषण लिहून देणाऱ्याने मोदींना तोंडावर पाडायचे कंत्राट घेतलेले दिसतेय , सामनातून मोदी सरकारवर हल्ला

भाषण लिहून देणाऱ्याने मोदींना तोंडावर पाडायचे कंत्राट घेतलेले दिसतेय , सामनातून मोदी सरकारवर हल्ला

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली जात आहे. त्यातच संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा संदर्भ देत जे लोक नरेंद्र मोदींना भाषण लिहून देत आहेत. त्यांनी मोदींना खोटे पाडायचे ठरवलेले दिसत आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

भाषण लिहून देणाऱ्याने मोदींना तोंडावर पाडायचे कंत्राट घेतलेले दिसतेय , सामनातून मोदी सरकारवर हल्ला
X

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली जात आहे. त्यातच संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा संदर्भ देत जे लोक नरेंद्र मोदींना भाषण लिहून देत आहेत. त्यांनी मोदींना खोटे पाडायचे ठरवलेले दिसत आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

सामनाच्या मोदींचे भाषण या अग्रलेखात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी अलिकडे संसदेत भाषणे केली. त्यात आमच्यामुळेच देश आहे, अशा आशयाचा मारा होता. तसेच पाच राज्यांमध्ये निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधानांनी संसदेत प्रचाराचे भाषण केले असल्याचा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबी, बेरोजगारी, आर्थिक तंगीस कंटाळून केलेल्या आत्महत्या याबद्दल काहीही भाष्य केले नाही. तर मंत्र्यांनी सादर केलेला आकडा हजारात दिसत असला तरी तो आकडा लाखांमध्ये असण्याची शक्यता आहे, असे मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आले.

पाच राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या भाषणात निवडणूका आम्हीच जिंकणार असा स्वर होता. त्यामुळे पंतप्रधानांनी निःपक्ष कसे बोलावे, संसदेत भाषण कसे करावे, बोलताना कोणती पथ्ये पाळावीत, याचे राजकीय संकेत ठरलेले आहेत, असे मत सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

मोदींनी संसदेच्या पायरीवर डोके ठेऊन अश्रुंना वाट मोकळी करून दिली होती. पण सात वर्षानंतर तीच संसद आणि लोकशाही अश्रु ढाळत आहे. इतके अराजक माजवले आहे, असा घणाघात सामनातून केला.

संसदेपासून ते सार्वजनिक व्यासपीठापर्यंत पंडित नेहरु, गांधी, काँग्रेसवर टीका करणे म्हणजे राज्य करणे नव्हे, असे सांगत उत्तरप्रदेशातील निवडणूका कठीण जात आहेत, म्हणून कर्नाटकमध्ये हिजाबवरून वाद पेटवला जात आहे. तर हिजाब हा काही हिंदू मुस्लिम दंगे पेटवण्याचा, हिंदु मुस्लिमांमध्ये भडके उडवण्याचा मुद्दा होऊ शकत नाही, असे सामनातून म्हटले आहे. हिंदू मुस्लिम, हिंदुस्तान पाकिस्तान असे खेळ केल्याशिवाय भाजपला निवडणूक जिंकता येत नाही, असा टोला लगावला. तर 7 वर्षात आपण काय केले हे सांगण्यासारखे नसल्याने काँग्रेस कमजोर असूनही काँग्रेसवर खापर फोडायचा असा प्रकार सुरू आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत भाषण करताना नेहरू नसते तर गोवा 1947 सालीच स्वतंत्र झाला असता, असे वक्तव्य केले आणि गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून सुटण्यासाठी उशीर झाला, असे म्हणत काँग्रेसवर खापर फोडले. पण गोवा मुक्तीसाठी देशभरातील लोक गेले होते. तेव्हा जनसंघाचे किती लोक त्यामध्ये सहभागी होते? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

भाजप सरकारच्या काळात गोव्यात पराकोटीचा भ्रष्टाचार बोकाळला आहे. मात्र पंतप्रधान गोव्यास आत्मनिर्भर आणि स्वर्णिम गोवा करणार असल्याचे म्हणत आहेत. तसेच पंतप्रधानांच्या भाषणांचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग होत असतो. मात्र मोदींच्या भाषणाचा ग्रंथ बनवायचा असल्यास यातील अनेक भाषणे गाळावी लागतील. कारण त्यामध्ये अनेक चुका आहेत, असे म्हणत पंतप्रधानांना भाषण लिहून देणाराने मोदींना खोटे पाडायचे ठरवलेले दिसत आहे, असा टोला सामनातून लगावला आहे.

पुढे सामनात म्हटले आहे की, मुळचे गोव्याचे असलेले मंगेशकर कुटूंब यावर पंतप्रधानांनी गोव्यात माहिती दिली. तसेच लता मंगेशकर यांचे बंधु हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीवर नोकरीस असताना त्यांनी वीर सावरकरांचे गीत गायले म्हणून त्यांना आकाशवाणीवरून काढून टाकल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला होता. या घटनेला अनेक दशके उलटून गेली आहेत. मात्र याबाबत कुठेही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे इतक्या वर्षानंतर सावरकरांचा तसा विषय नसताना त्यावर भाष्य करण्याची कोणतीही गरज नव्हती. मात्र मोदींनी सावरकरांचा विषय काढला. मात्र आकाशवाणीवर सावरकरांची अनेक गाणी वाजवली जात आहेत. तसेच आकाशवाणीने सावरकरांच्या कविता घराघरात पोहचवल्या, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

सामनातून असे म्हटले आहे की, सावरकरांवर इतका राग असता तर सावरकरांच्या गाण्यावरही बंदी घातली असती, असे म्हणत मोदी संसदेत करत असलेल्या भाषणात इतक्या चुका असलेली माहिती संसदेत का द्यावी, हो कोडेच आहे. ज्यांनी भाषण लिहून दिले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मत सामनाच्या अग्रलेखात मांडले आहे.

पंडित नेहरूंवर आरोप करताना त्यांच्यामुळेच गोव्याला उशीरा स्वातंत्र्य मिळाले असे मोदी शहा सांगत असतात. मात्र चीनी सैनिक भारताच्या मोठ्या भुभागावर घुसून बसले आहे. त्यांनी हुसकावण्यासाठी पंतप्रधानांना मोदी शहांची परवानगी लागणार नाही, असा टोला सामनातून लगावला. तर पोर्तुगीज तीनशे वर्षापासून गोव्यात ठाण मांडून होते. मात्र चीनी सैनिक एक वर्षापासून आहे. त्यांना कसे हाकलणार याबाबत पंतप्रधानांनी मत मांडले असते आणि मार्गदर्शन केले असते तर सत्य समजून घेता आले असते, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.

सामनातून पुढे म्हटले आहे की, मोदींचे लोक इतर भ्रष्टाचारावर बोलतात. मात्र मध्य प्रदेशात आदर्श घोटाळे सुरू आहेत. त्यामध्ये कन्याविवाह योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. तर गरीबांच्या मुलींच्या लग्नात घोटाळे होत आहेत. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक झाली ती पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या भाच्याला . ईडी, सीबीआय सध्या ओव्हर टाईम करत आहेत. तर हे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला 2024 पर्यंत सहन करावे लागेल, असे मत सामनाच्या अग्रलेखात मांडले आहे.

Updated : 11 Feb 2022 2:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top