Home > News Update > युध्दबंदीसाठी भारताचा रशिया युक्रेनवर प्रचंड दबाव

युध्दबंदीसाठी भारताचा रशिया युक्रेनवर प्रचंड दबाव

युध्दबंदीसाठी भारताचा रशिया युक्रेनवर प्रचंड दबाव
X

रशिया युक्रेन युध्दाला दहा दिवस पुर्ण झाले आहेत. मात्र युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकून पडले आहेत. परंतू रशियाने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यापार्श्वभुमीवर भारताकडून युध्दबंदीसाठी रशिया आणि युक्रेनवर मोठा दबाव असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

रशिया आणि युक्रेन युध्द सुरु आहे. त्यातच रशियाकडून युक्रेनच्या शहरांवर मिसाईल हल्ले केले जात आहे. मात्र त्या शहरांमध्ये भारतीय विद्यार्थी अडकून पडल्याने देशात सरकारविरोधात संतापाची लाट तयार होत आहे. त्यापार्श्वभुमीवर भारत सरकारने रशिया आणि युक्रेनवर युध्दबंदीसाठी प्रचंड दबाव असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात खारकीव्हमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गोळीबारात आणखी एक भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापार्श्वभुमीवर सरकारने तातडीने भारतीयांना मायदेशी आणावे यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे. त्यामुळे भारतीयांना सुरक्षित युध्दग्रस्त भागातून बाहेर काढण्यासाठी रशिया आणि युक्रेनवर भारत सरकारचा दबाव असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त अरिंदम बागची यांनी सांगितले.

अरिंदम बागची म्हणाले, युक्रेनमधील सुमी येथे अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल सरकारला काळजी आहे. त्यामुळे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यासाठी तात्काळ युध्दबंदी करण्याची मागणी रशिया आणि युक्रेनकडे केली आहे. तसेच माध्यमांसह राजनैतिक पातळीवरुनही रशिया आणि युक्रेनवर भारताने जोरदार दबाव तयार केला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली.

युक्रेनमधील सुमी शहरात अडकून पडलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व संभाव्य मार्गांचा शोध घेत आहोत, असेही बागची यांनी सांगितले.


Updated : 5 March 2022 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top