इस्रायल-इराण संघर्षाचा भारतालाही फटका
निर्यात होणार महाग, सुकामेव्याच्या किंमतीही वाढणार
X
इस्रायल आणि इराणमधील संघर्षाचा(Israel-Iran War) भारतालाही मोठा फटका बसू शकतो. पश्चिम आशियात युद्धाची तीव्रता वाढल्याने भारतीय निर्यातदारांवर (Indian Exporters) मोठा परिणाम होऊ शकतो. युद्धामुळे वाहतुकीच्या खर्चात (Logistics Costs) २० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. दुसरीकडे, भारतीय बाजारात सुकामेव्याच्या (Dry Fruits Prices) किमतींमध्येही वाढ होण्याची भीती आहे.
वाहतुकीच्या खर्चात किती वाढ होणार?
इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक व्यापार मार्गांवर परिणाम झाला आहे. या तणावाचा थेट परिणाम वाहतुकीच्या खर्चावर (Logistics Costs) होत आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांच्या लॉजिस्टिक्सच्या खर्चात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातही तणावाचे वातावरण असल्याने पाकिस्तानवरील हवाई मार्ग बंद आहे. त्यात आता इराणवरील हवाई मार्गही बंद झाला आहे. तसेच लाल समुद्र आणि सुवेझ कालव्यात जहाजांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होणार असल्याने वाहतुकीच्या खर्चात वाढ होणार आहे.
लाल समुद्रातील संकटामुळे वस्तू सागरी मार्गाऐवजी हवाई मार्गाने पाठवाव्या लागत असल्याने हवाई मालवाहतुकीची मागणी वाढली आहे. FIEO नुसार, भारतातून युरोपसारख्या मार्गांवर हवाई मालवाहतुकीच्या खर्चात ३०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे धातू आणि कमोडिटी क्षेत्रात भारताला काही ऑर्डर गमवाव्या लागल्या आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतीही या संकटाला अधिक गंभीर बनवत आहेत. इस्रायल-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत ७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याने सागरी वाहतुकीच्या खर्च वाढणार आहे.
सुकामेवा महाग होणार?
पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात ड्रायफ्रूट्स म्हणजेच सुकामेव्याच्या किमतींमध्ये (Dry Fruits Prices) वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. अफगाणिस्तान आणि इराणमधून आयात होणारा बदाम, पिस्ता, अंजीर आणि मनुक्याच्या किंमतीत या आधीच १५-१००टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात सर्वाधिक सुकामेव्याचा पुरवठा अफगाणिस्तानातून होतो. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमार्गे येणारा सुकामेव्याची आयात बंद झालीय. त्यानंतर इराणमार्गे सुकामेवा आयात केला जात होता. मात्र,आता इस्रायलने इराणवर हल्ला केल्याने या आयातीत अडथळे निर्माण झाले आहेत.