Home > News Update > 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणात पूर परिस्थिती

5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणात पूर परिस्थिती

5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणात पूर परिस्थिती
X

राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने जून महिन्यात दडी मारली. पण जुलैच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारादिला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. यामध्ये जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. एन डी आर एफच्या जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी, तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबईतील परिस्थितीवर देखील बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे. कोकणातील काही जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.

याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

Updated : 5 July 2022 3:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top