Home > News Update > रामदेव बाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का? IMA चं मोदींना पत्र...

रामदेव बाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का? IMA चं मोदींना पत्र...

रामदेव बाबा म्हणतात... मला कोणाचा बाप अटक करू शकत नाही. रामदेव बाबांचं चॅलेंज नक्की कोणाला? काय आहे संपुर्ण प्रकरण?

रामदेव बाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का? IMA चं मोदींना पत्र...
X

Courtesy -Social media

टीव्हीवर पंतजलीच्या जाहिरातीमध्ये झळकणारे बाबा रामदेव त्यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा अॅलोपॅथीला 'स्टुपिड आणि फालतू विज्ञान' असं म्हणत आहेत. बाबांच्या या वक्तव्यावर देशभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून 15 दिवसात माफी मागितली नाही तर 1000 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं IMA ने म्हटलं आहे. तसंच 72 तासात कोरोनील चा लोकांमध्ये भ्रम निर्माण करणारा प्रचार थांबवावा. कोरोनीलच्या सर्व जाहिराती थांबवाव्यात. बाबा रामदेव यांनी कोव्हिड लसीकरणानंतर होणाऱ्या साइड इफेक्टवर कोरोनील प्रभावी असल्याचं म्हटलं आहे. त्यातच बाबा रामदेव यांचा आणखी व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत बाबा रामदेवला कोणाचा बाप अटक करु शकत नाही. असं बाबा रामदेव म्हणत आहेत.

IMA चं मोदींना पत्र...

इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र पाठवलं असून या पत्रात रामदेव बाबा यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या विरोधात सरकारी प्रोटोकॉलनुसार उपचार सुरु असताना बाबा रामदेव सरकारी उपचाराच्या विरोधात प्रचार करत आहे. त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी IMA ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहित रामदेव बाबाच्या विरोधात संताप व्यक्त केला होता. रामदेव बाबा यांचं 'अशिक्षित' वक्तव्य 'देशातील शिक्षित समाजासाठी घातक आहे. तसंच गरीब लोक यांच्या वक्तव्याचा शिकार होत आहे.

रामदेव बाबा आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण हे स्वतः आजारी पडले की अॅलोपॅथीची औषधं घेतात, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, त्यांच्या मान्यता प्राप्त नसलेल्या औषधींचा खप वाढेल म्हणून ते लोकांची दिशाभूल करण्यासाठी ही वक्तव्य करत असल्याचं आरोपही इंडियन मेडिकल असोसिएशनने केला होता.

त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना पत्र पाठवलं होतं. या पत्रात डॉ. हर्षवर्धन यांनी "संपूर्ण देशातील डॉक्टर्स देवदूत ठरत आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत. बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेलं विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावना दुखावणारं आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी जाहीरपणे आपलं विधान मागे घ्यायला हवं", असं डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

या पत्रानंतर बाबा रामदेव यांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला होता. आणि विधान मागे घेत असल्याचं सांगितलं होतं. तामिळनाडूमधील कन्याकुमारी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयाचे प्रमुख जयलाल यांनी रामदेव बाबांना आव्हान केलं आहे की... ''योगगुरूंनी त्याच्या अनुयायांना लसीकरण करण्याचा सल्ला द्यावा तसेच कोरोना साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यायला हवा."

अभिनेता मन्सूर अली खानने लसीकरणाबाबत शंका उपस्थित केली म्हणून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं उदाहरण डॉ. जलाल यांनी यावेळी दिलं. तामिळमधील विनोदी अभिनेता विवेक यांच्या मृत्यूनंतर लसीबद्दल मन्सूर अली खानने शंका उपस्थित केली होती. त्यानंतर त्याला तामिळनाडू पोलिसांनी अटक केली होती. आता बाबा रामदेव यांच्याविरोधात आयएमएकडून कारवाई केली जात आहे. ही चांगली बाब आहे. तसेच कोव्हीड - १९ च्या विरोधातील लढा अधिक बळकट करण्यासाठी सरकारनेही अशा लोकांवर कारवाई केली. तर ते चांगले होईल, असं ही ते म्हणाले.

काय म्हटलंय रामदेव बाबा यांनी... भारतातील अॅलोपॅथीची रेमडेसिविर, फैबिफ्लू आणि इतर कोरोनाची औषधं फेल झाली आहेत. अॅलोपॅथी एक 'स्टुपिड आणि फालतू विज्ञान' आहे. पहिल्यांदा क्लोरोक्वीन (हाइड्रॉक्सीक्लोक्वीन) फेल झाली, त्यानंतर रेमडेसिविर फेल झालं, त्यानंतर यांचे एंटीबायोटिक्स फेल झाले, त्यानंतर यांचे स्टेरॉयड फेल झाले, प्लाज्मा थेरेपी वर यांनी काल बंदी घातली. माक्विन देखील फेल ठरलं आणि आता आजारपणासाठी दिली जाणारी फैविफ्लू देखील फेल झाली. लोक म्हणत आहेत काय तमाशा लावला आहे?' असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं आहे. ते पुढं म्हणतात...

अॅलोपॅथीचं यांचं कोणतंच औषधं कोरोनावर काम करत नाही. कारण तुम्ही शरीराचं तापमान कमी करू शकतात. मात्र, ज्या व्हायरसमुळे इन्फ्लेमेशनमुळे, ज्या बॅक्टीरीयामुळे, त्या फंगस ला, ज्यामुळे तुम्ही आजारी पडले आहात. त्यांचा उपचार तुमच्याकडे नाही. तर मग तुम्ही कसं ठीक करणार... मोठा दावा करत आहे. यावर मोठा विवाद ही होऊ शकतो. मात्र, लाखो लोकांचा मृत्यू अॅलोपॅथीची औषधं खाऊन झाला आहे. जितक्या लोकांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये न गेल्याच्या कारणाने झाला आहे.. ऑक्सिजन न मिळाल्याच्या कारणाने झाली आहे. त्या पेक्षा अधिक मृत्यू अॅलोपॅथीच्या औषधांनी झाले आहेत. स्टेरॉयड्स मुळे झाले आहेत. त्यामुळे आता लोकांच्या मृत्यूचं कारण अॅलोपॅथी आहे. असं रामदेव बाबा यांनी म्हटलं होतं.

Updated : 29 May 2021 6:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top