Home > News Update > सावधान ! जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालताना काय काळजी घ्यावी, महापालिकेने केले आवाहन

सावधान ! जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालताना काय काळजी घ्यावी, महापालिकेने केले आवाहन

तुम्हाला जखम झाली असेल आणि तुम्ही पावसाच्या पाण्यातून चालत असाल तर तुम्ही महापालिकेने केलेले आवाहन नक्की वाचा...

सावधान ! जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालताना काय काळजी घ्यावी, महापालिकेने केले आवाहन
X

पावसाळ्यात जखम झाली तर ती लवकर बरी होत नसल्याचा अनुभव अनेकांना येतो. त्यातच तुम्हाला जखम असेल आणि तुम्हा पावसाच्या पाण्यातून चालत असाल तर तुम्हाला लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे महापालिकेने सावधानतेचा इशारा दिला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा संथगतीने होत आहे. त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून चालताना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

महापालिकेने म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा साचलेल्या पाण्याशी किंवा चिखलाशी संपर्क आला तर त्या व्यक्तींना लेप्टोचा (Leptospirosis) संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आरोग्य खात्याला कार्यवाही करण्याचे निर्देश दे आहेत.

महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी कळविले आहे की, पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून चाललेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. शहा यांनी कळविले आहे की, अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात 'लेप्टोस्पायरोसिस' या रोगाचे 'लेप्टोस्पायरा' (स्पायराकिट्स) हे सूक्ष्म जंतू असू शकतात. अशा बाधीत पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल तरी अशा छोट्याशा जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असेही आवाहनही त्यांनी केले आहे.

'लेप्टोस्पायरोसिस' हा एक गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे याबाबत वेळीच प्रतिबंधात्मक औषध उपचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने किंवा आरोग्य केंद्रे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने येथे संपर्क साधावा. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी मार्गदर्शन व आवश्यक ते औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींना व मित्रमंडळींना देखील याबाबत माहिती द्यावी.

त्याचबरोबर पावसाळ्यात कोणताही ताप हा डेंग्यू, मलेरिया अथवा 'लेप्टोस्पायरोसिस' असू शकतो. त्यामुळे कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रतिबंधासाठी पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावेत, असं आवाहन महापालिकेने केले आहे.

Updated : 22 July 2023 5:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top