Home > News Update > कोकणात पावसाने हाहा:कार , पुढचे 3 दिवस रेड अलर्ट

कोकणात पावसाने हाहा:कार , पुढचे 3 दिवस रेड अलर्ट

कोकणात पावसाने हाहा:कार , पुढचे 3 दिवस रेड अलर्ट
X

HEADLINE – कोकणात पावसाने हाहा:कार , पुढचे 3 दिवस रेड अलर्ट

गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे कोकणात विशेषत: रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत नद्यांना पूर आला आहे. बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेतली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा दिला आहे. तसेच रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या , स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली.

नद्यांनी ओलांडली धोका पातळी

* रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे. *वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७.८ मीटर वरून वाहते आहे.

*काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत.

यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये सरकारी यंत्रणांनी नागरिकांना हलवणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य सुरु केले आहे.

रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी धोका पातळीवरून वाहत आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी , उल्हास या नद्या देखील इशारा पातळीवर वाहायला सुरुवात झाली आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या २४ तासांत ४८० मिमी पाऊस झाल्याने सावित्री व इतर नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पात देखील जोरदार पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे

धरण परिसरात देखील जोरदार पाऊस

भातसा धरण परिसरात गेल्या २४ तासांत ३३६ मिमी पाऊस झाला आहे. धरण ६३ टक्के तर सूर्या धरण परिसरात १५६ मिमी पाऊस झाला आहे. हे धरण देखील ६३ टक्के भरले आहे.

बारवी परिसरात देखील २५६ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण ६२ टक्के तर मोरबे धरणही २६० मिमी पाऊस झाल्याने ७१ टक्के भरले आहे. या धरणांचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या असून प्रशासकीय यंत्रणांना देखील तसे सांगण्यात आले आहे

Updated : 22 July 2021 9:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top