मराठवाड्यात पावसाने हाहा:कार, 12 जणांचा मृत्यू, 694 जनावरं वाहून गेली
X
गेल्या दोन दिवसात मराठवाड्यात झालेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचे संकट आल्याचे दिसून येत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून, तब्बल सव्वादोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
तर या पावसामुळे आतपर्यंत 12 जण दगावले असून, 694 जनावरे वाहून गेली आहेत. तर पुढील दोन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील 151 महसूल मंडळात अतिवृष्टी,झाली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील 11, जालन्यात 18, बीडमधील 39, लातूरमधील 10, उस्मानाबाद जिल्ह्यात 16, नांदेडातील 29, परभणीतील 22, नांदेडमध्ये 29 तर हिंगोलीत 21 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
जायकवाडी प्रकल्पाकडून पाण्याचा येवा सुरूच असल्यामुळे नांदेडमध्ये नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांदेडमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या प्रकल्पातून 2 लाख 49 हजार 535 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उमरी तालुक्यातील बळेगाव येथील प्रकल्पाचे 16 दरवाजे सुरू आहेत. वरच्या दिशेने पाण्याचा येवा असाच सुरू राहिला तर नांदेड जिल्हयातील अनेक गावांना आणखी फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूरस्थिती ओळखून नांदेड महापालिकेने शहरात 6 सुरक्षित ठिकाणी लोकांच्या निवाऱ्याची सोय केली आहे.






