Home > News Update > रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर, 5 जण बेपत्ता

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर, 5 जण बेपत्ता

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर, 5 जण बेपत्ता
X

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने बहुतांश नद्यांना पूर आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 186.51 मि.मी.पावसाची नोंद झालेली आहे. महाड तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यांमध्ये 120 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्हयातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान देखील झालेले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी इंडियन कोस्ट गार्ड व स्थानिक बचाव पथके तयार ठेवण्यात आलेली आहेत. प्रशासनाच्या पूर्वसूचनांकडे दुर्लक्ष करुन काही नागरिक मासेमारीसाठी व धबधबे, नदी किनारी, तलावाच्या ठिकाणी पोहोण्यासाठी जात आहेत. त्यामुळे दुर्घटना घडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.

जिल्ह्यात विविध ठिकाणी 5 व्यक्ती बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. मौजे मेदडी येथील 42 वर्षांचे सुरेश हरेश कोळी, हे मासेमारीसाठी खाडीमध्ये गेले होते. पण त्यांची बोट उलटल्याने ते बेपत्ता आहेत. तर मौजे देवपाडा गावातील प्रमोद जोशी हा 26 वर्षांचा तरुण पोशीर नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेला असून स्थानिक प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू आहे. मौजे पोयंजे येथील पाली बुद्रुक डॅमवर पोहोण्यासाठी गेलेला दिपक गंभीरसिंग ठाकूर हा तरुण देखील बेपत्ता झालेला आहे.

तर खालापूर तालुक्यामधील खोपोली क्रांतीनगरमधील दोन लहान मुले पाताळगंगा नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही मुले सख्खे भाऊ-बहिण असून, स्थानिक प्रशासनाकडून शोधमोहीम सुरु आहे. निलंभ्भा श्रीकांत हंचलीकर (वय वर्षे 7) आणि बाबू श्रीकांत हंचलीकर (वय वर्षे 3) अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत.

जिल्हयातील पेण तालुक्यातील तांबडशेत, दूरशेत, जिते अशा विविध सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झालेले आहे. मौजे बळवली-दूरशेत येथील 20 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. मौजे चुनाभट्टी ता.पेण येथील 80 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

महाड शहरातील दस्तुरीनाका येथे पाणी भरले होते. अंबा नदीची पाणी पातळी वाढल्याने नागोठणे बसस्थानक, बाजारपेठेच्या परिसरामध्ये पाणी भरले होते. पनवेल, उरण तालुक्यातील काही भागांतील घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले आहे. पण जिल्हयातील पूर परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या. सुकेळी खिंड ता.रोहा येथे मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळून वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. जे.सी.बीच्या सहाय्याने दरड हटविण्यात आली. वडवली-दिघी रस्त्यावर पावसामुळे माती रस्त्यावर आली होती. ही माती हटवण्याचे काम सुरू लगेच सुरू करण्यात आले. माथेरान जुमापट्टी येथे दरड कोसळून मोठमोठे दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. ही दरड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला आहे..

हवामान विभागाने 23 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्हयातील नागरिकांनी सतर्क राहून स्वत:ची व इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अतिवृष्टीचे प्रमाण विचारात घेवून वेळीच सुरक्षित ठिकाणी आश्रयाला जावे. तसेच अतिवृष्टीच्या वेळी धबधबे, तलाव, गड/किल्ले, नदी/समुद्र किनाऱ्यावर जावून नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

Updated : 20 July 2021 2:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top