Home > News Update > दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोलापूरात इतिहासाची सोनेरी पाने उलगडणार

दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोलापूरात इतिहासाची सोनेरी पाने उलगडणार

दि.25 व 26 फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दोन दिवसीय संमेलन

दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोलापूरात इतिहासाची सोनेरी पाने उलगडणार
X

सोलापूर : सोलापूर शहर आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत सुमारे अकरा वेळा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटी दिल्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर उभ्या राहिलेल्या दलित पँथर या संघटनेने देशभरात झंझावात निर्माण केला होता. या दलित पँथर संघटनेस 9 जुलै 2022 रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सोलापुरातील हुतात्मा स्मुर्ती मंदिर येथे दि. 25 व 26 फेब्रुवारी रोजी ' जागर क्रांतीचा उत्सव विचारांचा ' या दोन दिवसीय प्रबोधनात्मक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे असेल

शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.15 वाजता दलित पॅंथरचे सहसंस्थापक अर्जुन डांगळे ( मुंबई), सुधाकर ओलवे (मुंबई), दत्ता गायकवाड (सोलापूर) ,लक्ष्मण यादव (नवी दिल्ली) आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे.

शनिवारी दूसऱ्या सत्रात सकाळी 11 वाजता सोलापुरातील पॅंथर चळवळीतील शिलेदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. तिसऱ्या सत्रात प्रा. एम.आर. कांबळे (सोलापूर) , दिलीप चव्हाण (नांदेड) यांचा परिसंवाद होईल. दुपारी 3.15 वाजता चौथ्या सत्रात संकेत पाटील दिग्दर्शित "खैरलांजी" हे नाटक होणार आहे. पाचव्या सत्रात काव्यसंगिनीमध्ये नितीन चंदनशिवे(सांगली), प्रा.अंजना गायकवाड (सोलापूर) , राजेंद्र गोणारकर (नांदेड), रोहित देशमुख(सोलापूर) हे आपल्या कविता सादर करतील. सहाव्या सत्रातील परिसंवादात पवनकुमार शिंदे(परभणी), सिद्धार्थ शिंनगारे (औरंगाबाद) आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. रात्री 8 वाजता सातव्या सत्रात सोलापुरातील डॉ. जयभीम शिंदे यांचा "आंबेडकरी जलसा" होणार आहे.

रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता परिसंवादाचे पहिले सत्र होणार आहे. या सत्रात दादाभाऊ अभंग (मुंबई), मच्छिंद्र भोसले (सोलापूर), अजिंक्य चांदणे (बीड), सचिन निकम (औरंगाबाद), दत्ता थोरे (सोलापूर) आदी मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत. दुपारी 2.15 वाजता "स्त्री चळवळ" या विषयावर होणाऱ्या परिसंवादात दिपाली साळवे (मुंबई), योगिनी पगारे (मुंबई) यांचा सहभाग राहणार आहे.तिसऱ्या सत्रात दिग्दर्शक राहुल माने यांचे "ठिणगी - नामांतर लढा" हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

त्यानंतर चौथ्या सत्रात दुपारी 4:30 वाजता "ओवाळू भीमाला" हा जात्यांवरील ओव्या आणि पारंपारिक गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती व मार्गदर्शक दत्ता गायकवाड आहेत. यामध्ये सुधीर चंदनशिवे यांचे दिग्दर्शन, जीवन शिंदे व सहकारी यांचे संगीत संयोजन तर प्रा. अंजना गायकवाड यांचे निवेदन राहणार आहे. यामध्ये सुनीता गायकवाड, चंदनशिवे, सुचित्रा थोरे, जयश्री रणदिवे, शीला हावळे यांचा सहभाग राहणार आहे.

सायंकाळी 6:15 वाजता पाचव्या सत्रात काव्यसंगिनीमध्ये सागर काकडे( पुणे), अतुल खरात (मुंबई ), सचिन डांगळे (मुंबई ), चरण जाधव (मुंबई), सुमित गुणवंत (पुणे), संविधान गांगुर्डे (नाशिक) यांचा सहभाग राहणार आहे. रात्री 7:15 वाजता रॅप सॉंग मध्ये झुंड फेम विपिन तातड (अमरावती), एम.सी मित्तल (पुणे), रोहन कपाळे (नांदेड) यांचा सहभाग राहणार आहे.

या वैचारिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर शहर आणि जिल्ह्याला आंबेडकरी विचारांची मेजवानी मिळणार आहे. अशा या सामाजिक व सांस्कृतिक विचार महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीचे अनुराग सुतकर , सत्यजित वाघमोडे, यांनी केले आहे.

Updated : 24 Feb 2023 4:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top