Home > News Update > राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरण करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरण करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरण करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
X

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पूर्वतयारी बैठक झाली. या बैठकीस आरोग्य मंत्री राजेश टोपे जालना येथून सहभागी झाले.

कोरोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे, त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले. आपापल्या जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्वस्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचनाही केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी चाचण्यांचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा. कोविडचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोरोना गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्त़न ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

Updated : 3 Nov 2021 3:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top