Home > News Update > `दिल्ली चलो' शेतकरी मोर्चा अखेर दिल्लीत पोचला..

`दिल्ली चलो' शेतकरी मोर्चा अखेर दिल्लीत पोचला..

प्रसारमाध्यमांनी आणि केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं असलं तरी कृषी कायद्यांविरोधात महामोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना संघर्ष करुन अखेर दिल्ली गाठली आहे. दिल्ली पोलिसांनी आज शेतकऱ्यांना निदर्शनं करण्याची परवानगी दिली आहे.

`दिल्ली चलो शेतकरी मोर्चा अखेर दिल्लीत पोचला..
X

केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या तीन महत्त्वाच्या कृषी सुधारणा विधेयकांचा विरोध करण्यासाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पंजाब-हरियाणातून पायी चालत आलेल्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं होतं. पंजाब-हरियाणाच्या शंभू बॉर्डरजवळ पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला होता. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. हरियाणाहून दिल्लीकडे येणाऱ्या सीमा पोलिसांनी बॅरिकेड घालून बंद केल्या आहेत.

पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी टॅक्टर, ट्रॉली आणि इतर वाहनांनी दिल्लीकडे कुच करण्याचा प्रयत्न करत होते. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये शिरण्यापासून थांबवण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तयार ठेवला आहे.

मोठ्या संघर्षानंतर मात्र, आज या शेतकऱ्यांना दिल्लीतील बुराडी मैदानावर आंदोलनाची परवानगी देण्यात आली. शेतकरी संघटनांनी ही माहिती दिली आहे. यासंबंधी माहिती देताना दिल्ली पोलीस प्रवक्ते ईश सिंघल म्हणाले, "शेतकरी नेत्यांशी चर्चा केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत येऊन आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. दिल्लीतील बुराडी स्थित निरंकारी समागम मैदानावर ते शांतता राखत निदर्शनं करू शकतात. शेतकऱ्यांनी इतरांना त्रास होऊ नये, यासाठी शांतता व्यवस्था कायम ठेवण्याचं आवाहनही आम्ही केलं आहे.

"पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही दिल्ली पोलिसांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले, "केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत दाखल होण्याची परवानगी देऊन चांगला निर्णय घेतला आहे. यानंतर शेतकऱ्यांचे मुद्दे जाणून घेऊन त्यांना अधिक त्रास होऊ नये, यासाठी केंद्राने त्यांच्याशी चर्चाही करावी." केंद्र सरकारने शेतकऱ्यांची किमान हमी भावाची मागणी मान्य करावी, असं आवाहनही कॅप्टन अमरिंदर यांनी यापूर्वीच केलं आहे. दरम्यान, "चर्चेसाठी केंद्र सरकार कायम तयार होतं आणि समस्येवर तोडगाही चर्चा करूनच निघेल, आंदोलनाने नव्हे", असं हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलं आहे.

याआधी दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवर दिल्ली पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झडप झाली होती."दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना आधी शांतपणे उभं रहायला सांगितलं. मात्र, नंतर त्यांनी अश्रूधूर सोडला." इकडे दिल्लीत शेतकरी मोर्चा बघता दिल्लीतील 9 खेळाच्या मैदानांवर तात्पुरत्या जेल उभारण्याची मागणी केली होती. मात्र, दिल्ली सरकारने पोलिसांची मागणी फेटाळली होती. पोलिसांच्या मागणीला दिल्लीच्या गृह विभागाने पाठवलेल्या उत्तरात म्हटलं आहे, "शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या."

उत्तरात पुढे लिहिलं आहे, "शेतकऱ्यांना जेलमध्ये डांबणं, हा यावरचा तोडगा नाही. हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक आहे. अहिंसक पद्धतीने आंदोलन करणं, प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे. यासाठी त्यांना तुरुंगात डांबलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच खेळाच्या मैदानावर तात्पुरते कारागृह उभारण्याची दिल्ली पोलिसांची मागणी दिल्ली सरकार नामंजूर करत आहे."

काल कृषी कायद्याच्या विरोधात 'दिल्ली चलो' मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीपासून 12 ते 15 किलोमीटर दूरवर असणाऱ्या बॉर्डरजवळ रोखण्यात आलं होतं .बॅरिकेड्स लावत या शेतकऱ्यांना रोखण्यात आलं. पण शेतकऱ्यांच्या एका गटाने ही बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न केला.दिल्लीच्या सीमेजवळच्या या भागामध्ये पोलिस पथकं मोठ्या प्रमाणात रात्री तैनात होती. शेतकरी मोर्चा पुढे सरकू नये म्हणून तीन पातळ्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं आणि ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. मोर्च्यातल्या या शेतकऱ्यांनी रात्र रस्त्यावरच घालवलीय. पोलिसांनी प्रयत्न करूनही हे शेतकरी परत फिरलेले नाहीत. शेतकऱ्यांनी सांगितलं, "आमच्याकडे एक महिन्याचं रेशन आहे. आमच्याकडे जेवण तयार करण्यासाठी स्टोव्ह आणि इतर गोष्टीही आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी आमच्याकडे ब्लॅंकेटही आहे."

केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करणारा हा शेतकरी मोर्चा आहे. आणि पुढच्या काही दिवसांसाठीचं अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू आपल्यासोबतच घेऊन हे शेतकरी निघालेले आहेत. दिल्लीत ठाण मांडण्यांचा त्यांचा बेत आहे. पण ते दिल्लीपर्यंत पोहोचू नयेत यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे.

शेतकऱ्यांचा आरोप

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, नवीन कृषी कायद्यांमुळे कृषीक्षेत्र श्रीमंत कॉर्पोरेट कुटुंबाच्या हाती जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. त्यांच्या माहितीप्रमाणे, ज्या उत्पादनांवर हमीभाव मिळत नाही त्यांना कमी किमतीत विकावं लागतं.

दिल्लीत मेट्रोसेवा थांबवली

शेतकऱ्यांचं तिव्र आंदोलन लक्षात घेता दिल्ली मेट्रो रेल्वे प्रशासनाने दिल्ली मेट्रो पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्लीहून नोएडा, फरीदाबाद, गाजियाबाद आणि गुरुग्रामकडे जाणारी मेट्रोसेवा बंद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या 'चलो दिल्ली' आंदोलनामुळे पोलिसांनी फरीदाबाद-दिल्ली सीमा सील केली आहे. फरीदाबाद पोलिसांच्या माहितीनुसार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिल्लीत पाय ठेऊ द्यायचे नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.


Updated : 27 Nov 2020 12:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top