Home > News Update > नागपुरात बाबा रामदेव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

नागपुरात बाबा रामदेव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

नागपुरात बाबा रामदेव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल
X

कोरोना रोगावर औषध निर्मिती केल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप......नऊ जणांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी

भंडारा : पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे सर्वेसर्वा योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनावर १०० टक्के मात करणारी औषधी बनविल्याचा दावा केला आहे. हा दावा खोटा असून नागरिकांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे महासचिव रामकिशन ओझा यांनी केला आहे. शासनाची कुठल्याही प्रकारची मान्यता नसताना नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार बाबा रामदेव यांनी केल्याचा आरोप करून ओझा यांनी याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

◆ रामकिशन ओझा यांनी कोराडीचे पोलीस निरीक्षक वजीर शेख यांना ही तक्रार दिली आहे. तक्रार दाखल करतेवेळी भंडारा येथील जिया पटेल हे उपस्थित होते.

(योगगुरू बाबा रामदेव) - पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड, आचार्य बालकृष्ण - पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड, तोमर (बलराज) - निम्स व अन्य सहा यांच्याविरुद्ध रामकिशन मोतीलाल ओझा रा. प्रभा सदन, गिरीपेठ नागपूर यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

◆ रामकिशन ओझा यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, वरील सर्वांनी कोरोनावर १०० टक्के मात करणारी औषध बनविल्याचा दावा केला आहे. एका उद्घाटन सोहळ्याप्रसंगी हा दावा केला असल्याचा आरोप ओझा यांनी केला असून त्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. तो नागरिकांसाठी धोकादायक ठरणार असल्याचे या तक्रारीत नमूद आहे. तयार करण्यात आलेल्या औषधी संदर्भात रिसर्च आणि ट्रायल करताना ६९ टक्के कोरोना बाधित तीन दिवसात तर १०० टक्के कोरोना बाधित सात दिवसात स्वस्थ झाल्याचा दावा तक्रारीत नमूद व्यक्तीने केला असल्याचा आरोप यांनी केला आहे.

◆ मात्र, ही औषधी कुठे तयार केली? त्याला शासनाची मान्यता कधी मिळाली ? आणि ज्‍या कोरोना बधितांवर ट्रायल घेण्यात आले ते कोण ? असा प्रश्न ओझा यांनी उपस्थित करतानाच कोरोना बाधित रुग्णांवर केवळ सरकारच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्‍टरच औषधोपचार करीत असताना पतंजलीच्या औषधनिर्मिती प्रक्रियेत कोरोना बाधित रुग्ण कसे होते? असा गंभीर प्रश्न ओझा यांनी या तक्रारीत नमूद केला आहे. त्यामुळे या तयार करण्यात आलेल्या औषधी बाबतच शंका उपस्थित करून या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप ओझा यांनी लावला आहे. त्यामुळे तक्रारीत नमूद असलेल्या व्यक्तींनी दावा केलेल्या औषधी बाबत सखोल चौकशी करावी. या माध्यमातून सरकारची परवानगी नसतानाही लोकांना भ्रमित करून अपराध केल्याचा आरोप ओझा यांनी केला आहे. या औषधीच्या निर्मिती केल्याच्या दाव्यावरून नागरिकांनी निश्चिंत होऊन सोशल डिस्टंसिंग व आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत नियमांचे उल्लंघन सुरू केलेले आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवनाशी खेळू पाहणाऱ्या आणि या माध्यमातून आर्थिक लुबाडनूकीचा गोरखधंदा करू पाहणाऱ्या सर्व तक्रारीतील नमूद व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रामकिशन ओझा यांनी केली आहे. या तक्रारीवर पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Updated : 25 Jun 2020 7:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top