Home > News Update > आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अंधारात

आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अंधारात

राज्य सरकार सध्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेले असताना मराठवाड्याची पाणी सुरक्षाच धोक्यात आली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अंधारात
X

औरंगाबाद: मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा वीजपुरवठा गेल्या महिन्याभरापासून बंद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठा मातीचे धरण आता अंधाराच्या छायेत असून,यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणाचे 5 लाख 42 हजार 74 रुपयांचे वीजबिल थकले आहे. तर धरण प्रशासनाने 31 मार्च 2020 रोजी शेवटचे बिल भरलेले आहे. जवळपास वर्षभरापासून वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची पूर्वसूचना महावितरणने धरण प्रशासनाला नोटिशीद्वारे दिली होती. तसेच नोटीस दिल्यानंतरही 15 दिवस महावितरणने वारंवार बिल भरण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही धरण प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने धरणाचा वीजपुरवठा 22 फेब्रुवारी 2021 रोजी वीज बंद केल्याचं महावितरण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

याचबरोबर पैठण येथील प्रसिद्ध ज्ञानेश्वर उद्यानाचे 13 लाख 60 हजार 812 रुपयांचे वीजबिल थकलेले आहे. या जोडणीचे 20 मार्च 2020 रोजी शेवटचे बिल भरलेले आहे. त्यामुळे त्यांचाही कनेक्शन बंद करण्यात आला आहे. धरणाच्या सुरक्षेचं काय? पैठण येथील जायकवाडी धरण हे सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. त्यासाठी खास सशस्त्र पोलिस कर्मचारी नेहमी तैनात असतात. यासाठी येथे पोलीस चौकी सुद्धा उभारण्यात आलेली आहे. मात्र आता वीज बंद असल्याने रात्रीचे लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Updated : 24 March 2021 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top