Home > News Update > सोलापूर: बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला सीना नदीला आलेल्या पूराने मोठं नुकसान, काही गावांचा तुटला संपर्क

सोलापूर: बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला सीना नदीला आलेल्या पूराने मोठं नुकसान, काही गावांचा तुटला संपर्क

सोलापूर: बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला सीना नदीला आलेल्या पूराने मोठं नुकसान, काही गावांचा तुटला संपर्क
X

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला पूर आला असून या पुराच्या पाण्यामुळे मलिकपेठ, शिरापूर, अष्टे,बोपले येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर पुराच्या पाण्यामुळे शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सीना नदीला अचानक पूर आला असल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पाणी उपसण्याच्या मोटारी पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्यानेही येत्या तीन-चार दिवसात पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. सीना नदी अहमदनगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येत असल्याने काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे या जिल्ह्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.

सध्या सीना नदीला पूर आला असून नदी काठी असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. या नदीच्या पुरामध्ये उडीद, सोयाबीन ,मका, ऊस आदी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिली होती. सध्या टोमॅटो च्या शेतीने शेतकरी अडचणीत आला आहे. तसेच ढोबळ्या मिरचीला कमी भाव असल्याने अनेक शेतकऱ्यांनी या मिरचीची झाडे उपसून टाकली आहेत. शेतकरी अगोदरच अडचणीत असल्याने आता त्यात पुराच्या पाण्याची भर पडली आहे. यामुळे नदीकाठच्या शेतीवर मोठा परिणाम झाला आहे.

नदीला अचानक आले पाणी...

जिल्ह्यातील सीना नदीला पाणी आल्याने नदी काठच्या गावातील जनजीवनांवर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्यात गेल्याने शेतकरी नदीकाठी उभे राहून आपल्या शेती पिकाचे किती नुकसान झाले आहेत. नदीला अचानक पाणी आल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली. शेतातील वस्तीवर असणारी जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम शेतकरी करीत आहेत.

बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांचे नुकसान

बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पुराचे पाणी काही कमी होईल. याकडे त्याचे लक्ष लागून राहिले आहे. बैल पोळ्याच्या सण शेतात साजरा करण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले असताना नदीकाठी रहिवासी असणाऱ्या शेतकऱ्यांवर संकट आल्याचे सांगण्यात येत आहे.

तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी पुराचा घेतला आढावा

मोहोळचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना नदीला पूर अचानक पूर आल्याचे समजताच त्यांनी तात्काळ पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित गावचे तलाठी, मंडल अधिकारी यांना सक्त सूचना देऊन पूरग्रस्त गावात जाऊन पाहिणी करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे तलाठी,मंडल अधिकारी सीना नदीच्या पूर परिस्थिती चा आढावा घेत आहेत. यावेळी तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी सीना नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे आडे आवाहन केले आहे.

गेल्या वर्षी आला होता याच नदीला महापूर

गेल्या वर्षी पावसाळ्याच्या दिवसात या नदीला अचानक महापूर आला होता. त्यामुळे नदीकाठी असणारे शेतकरी पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. त्यावेळी प्रशासनाने एनडीआरफ ची टीम मागवून अनेक लोकांना पुराच्या पाण्यातून वाचवले होते.

या पुराच्या पाण्यात जनावरे आणि शेती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली होती. शेतातील वस्तीवर बांधलेली अनेक दुभती जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यावेळी शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली होती.

Updated : 6 Sep 2021 2:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top