डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या, काय होतं अखेरचे बोलणे...
X
समाजाने नाकारलेल्या अनेकांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या बाबा आमटे यांच्या आनंदवनावर शोककळा पसरली आहे. कारण बाबा आमटे यांच्या नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर आमटे परिवारातील मतभेद किती टोकाला गेले होते हे स्पष्ट झाले आहे.
आत्महत्येच्या काही वेळेपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी रवींद्र आंबेकर यांना अनेक मेसेज केले, पण रवींद्र आंबेकर यांनी ते मेसेज वाचण्याआधीच त्या डिलीट करत होत्या. शेवटी त्यांनी रवींद्र आंबेकर सिग्नल या एपवर संपर्क साधण्यास सांगितले. पण रवींद्र आंबेकर ते एप वापरत नसल्याने अखेर त्यांनी टेलिग्राम या एपवर संवाद साधण्यास सांगितले. पण तांत्रिक कारणामुळे रवींद्र आंबेकर यांना त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. त्यानंतर काही महत्त्वाचे काम असल्याने आपण दुपारी बोलू असे रवींद्र आंबेकर यांनी शीतल आमटेंना सांगितले आणि त्यानंतर त्यांनी फ्री झालात की मला पिंग करा असा मेसेज केला. पण काही वेळानंतर शीतल आमटे यांच्या आत्महत्येची खळबळजनक बातमी आली.
गेल्या काही महिन्यांपासून आनंदवनच्या व्यवस्थापनावरुन आमटे परिवारामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याची चर्चा होती. डॉ. शीतल आमटे करजगी या आनंदवनचे व्यवस्थापन पाहण्याचे काम करत होत्या. त्यांच्या कारभारावरुन त्यांचे भाऊ कौस्तुभ आमटे, डॉ. अनिकेत आमटे यांच्यत वाद असल्याचीही चर्चा होती. दरम्यान काही दिवसांपूर्वीही शीतल आमटे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ करुन त्यामध्ये त्यांच्या परीवारातील काही जणांवर गंभीर आरोप केले होते. पण काही वेळानंतर त्यांनी हा व्हिडिओ डीलिट केला. त्यानंतर युट्यूबवरही त्यांनी तो व्हिडिओ प्रायव्हेट करुन ठेवला होता. हा व्हिडिओ करत असताना त्यांना ढसाढशा रडत असल्याचेही दिसत होते.
दरम्यान मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्या टेलिग्राम एपवर त्यांनी आत्महत्येच्या काही वेळापूर्वी एक मेसेज टाकला होता. या मेसेजमध्ये त्यांनी म्हटले होते, " The instability continues. Senior Amtes want to resolve but Aniket and Kaustubh are extremely power hungry. I don't want any power or anything apart from honest and integral spine for this organisation which they won't be able to keep."
यानुसार, "अस्थिरता कायम आहे. ज्येष्ठ आमटेंना वाद मिटवायचा आहे, पण अनिकेत आणि कौस्तुभ हे सत्तालोभी आहेत. मला कोणतीही सत्ता नकोय. पण मला या संस्थेचे प्रामाणिक आणि अविभाज्य भाग व्हायचे आहे. जे हे लोक कधीही करु शकणार नाहीत"
आता त्यांनी आत्महत्येपूर्वी कुणाकुणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता ते अजून कळू शकलेले नाही. आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या त्या सीईओ होत्या. डॉ. शीतल आमटे यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची माहिती मिळतेय. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात त्यांना तातडीने उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. पण मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही.
शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.
शीतल आमटे यांचे संस्थेच्या कामात मोठे योगदान असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अयोग्य वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचं प्रकाश आणि विकास आमटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला होता. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून करण्यात आली होती. या निवेदनामुळे आमटे कुटुंबातील मतभेद पुन्हा एकदा स्पष्ट झाले होते.
हे पत्र माध्यमांत प्रसिध्द झाल्यानंतर यावर ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी "हे नेमकं चाललंय काय? कुटंबातली सत्तेची भांडण की आणखी काही? शीतलला का घेरलंय सगळ्यांनी?" असा सवाल आमटे परिवाराला केला होता.
बाबा आमटे यांच्या कार्याने पावन झालेल्या आनंदवन मध्ये आमटे परिवारात शीतल आमटे यांनी गंभीर आरोप केले होते. आपण आनंदवनचा कारभार पहायला लागल्यापासून आर्थिक शिस्त आणल्याने अनेकजण नाराज झाले आणि त्यामुळेच आपल्या विरोधात अपप्रचार केला गेला असेही त्यांनी म्हटले होते. तसेच प्रसुतीनंतर आपण नैराश्यात होतो. पण त्याचा गैरवापर करत माझे मानसिक संतुलन बिघडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी यामध्ये केला होता.
काही महिन्यांपूर्वी एका वृत्तपत्राने आनंदवनात मनमानी सुरू असल्याचे वृत्त दिल्यानंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या वृत्तात बाबा आमटे यांच्या प्रयत्नांनी उभे राहिलेले अनेक उपक्रम बंद पडल्या असल्याचे किंवा त्यांना घरघर लागली असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच कार्यकर्त्यांचा छळ, आरोप, प्रत्यारोपांमुळे आमटे कुटुंबातील वाद यामुळे आनंदवन वेगळ्याच चर्चेचा विषय ठरले होते. कुष्ठरुग्णांनी स्वयंपूर्ण व्हावे म्हणून आनंदवनात अनेक उत्पादने तयार व्हायची, ती जवळजवळ बंद झाली होती, असेही या वृत्तात सांगण्यात आले होते.






