Home > News Update > गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम पक्ष घेणार नाही - नवाब मलिक

गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम पक्ष घेणार नाही - नवाब मलिक

गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम पक्ष घेणार नाही - नवाब मलिक
X

मुंबई : गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास पक्षाच्यावतीने मनाई करण्यात आली असून तसे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाहीत ही पक्षाची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊन गर्दी जमवू नका किंवा एखाद्या कार्यक्रमातून गर्दी होईल असा कार्यक्रम घेऊ नका थोडे दिवस थांबा असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये धरला आणि तशा सूचना तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांना केल्या आहेत.त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी पाऊले टाकली पाहिजेत ही पक्षाची भूमिका असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षातील वरिष्ठ नेते गर्दी करू नका असं आवाहन करत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी पक्षातील काही नेते कार्यकर्त्यांचे मेळावे घेताना दिसत आहेत तर कुठे विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी नेते हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सुपे येथे भर पावसात मोठया संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ पार पडला तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला ज्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, विशेष म्हणजे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावल्याने आव्हाड यांनी समाधान व्यक्त करत आर आर पाटील यांची आठवण झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे एकीकडे गर्दी करू नका असं सांगितलं जातं असताना दुसरीकडे पक्षातीलच वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना गर्दी होताना दिसत आहे.

Updated : 6 Sep 2021 10:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top